वरंध:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तस तशा इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांना लॉटरी लागली तर काही उमेदवार नाराज झाले आहेत. वरंध जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले तर वरंध पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला व खरवली पंचायत समिती गणासाठी ओबीसी महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. या जिल्हा परिषद गटातून मागील निवडणुकीत मनोज काळीजकर यांनी बाजी मारली होती. तर मनोहर रेशीम यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. आता मात्र एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही उमेदवार एकाच पक्षांमध्ये आहेत. शिवसेना पक्षाकडून वरंध पंचायत समिती गणामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, हा मतदारसंघ मंत्री भरतशेठ गोगावले यांचा बालेकिल्ला समजला जातो, या गणातून मागील निवडणुकीत सपना मालुसरे यांनी निवडणूक जिंकून थेट पंचायत समिती सभापतीची खुर्ची मिळवली होती,आता मात्र या पंचायत समिती गणातून इच्छुकांची संख्या जास्त आहे. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कन्या वैशाली गोगावले- मालुसरे यादेखील याच गणातून इच्छुक असल्याची बातमी प्रसारित झाली होती. तर निगडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नूतन गोपाळ मोरे व माजी पंचायत समिती सभापती सपना मालुसरे यादेखील याच गणातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार हे आता पाहणे गरजेचे आहे. या जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती गणातून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा थेट सामना रंगणार असून यामध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील उडी घेतली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उच्चशिक्षित असलेला चेहरा कुमारी पूर्वा आनंद सुर्वे वरंध पंचायत समिती गणातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पिंपळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांची संपूर्ण ताकद कुमारी पूर्वा आनंद सुर्वे हिच्या पाठीशी असून या मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार,कोण जिंकणार, कोण हरणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.









