मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई
मंत्रालयात पुन्हा एकदा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यावेळी अर्थ आणि नियोजन विभागातील अधिकारीच एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई नवी मुंबईतील खारघर परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी लाड याने संबंधित व्यक्तीकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने ९ मार्च २०२६ रोजी एसीबीच्या मुंबई कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली होती.
यानंतर १६ मार्च २०२६ रोजी एसीबीकडून करण्यात आलेल्या पडताळणीत संबंधित अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याचे आणि ती स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार ५ एप्रिल २०२६ रोजी एसीबीने खारघर, नवी मुंबई येथे सापळा रचला आणि विलास लाड याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या घटनेमुळे पुन्हा एकदा मंत्रालयातील भ्रष्टाचाराचा चेहरा समोर आला असून, सरकारी यंत्रणेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.










