मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होतेय. कुणी या साहेबांसोबत जातंय तर कुणी त्या साहेबांसोबत. त्यामुळे आज अमुक अमुक पक्षासोबत असलेला नेता किंवा पदाधिकारी उद्या कोणत्या पक्षात असेल हे काही सांगता यायचं नाही. म्हणजे ही सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. आता वळूया ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेकडे. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यानी, पदाधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्याच पण यंदाचा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस जास्तच खास आहे कारण राज ठाकरेंनी स्वतः मातोश्री निवासस्थानी जात उद्धव यांना शुभेच्छा दिल्यात. राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे काही निवडक प्रसंग सोडले तर ते मातोश्रीवर गेले नव्हते. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते, तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर गेलेत. जवळपास 20 वर्षानंतर राज ठाकरेंची पाऊलं मातोश्रींकडे वळली आहेत. एरवी उद्धव ठाकरे सहसा कोणीही मातोश्रीवर आल्यावर गेटपर्यंत त्यांना घेण्यासाठी जात नाहीत. मात्र, आज राज ठाकरे आले तेव्हा उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या गेटवरच उभे होते. राज ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. हे दृश्य पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
निमित्त जरी वाढदिवसाचं असलं तरी चर्चा मात्र होतेय ठाकरे बंधूंच्या युतीची. आता हया युतीची हवा महानगरपालिका निवडणुकीपर्यंत जाणूनबुजून दिली जातेय का असा सवाल उपस्थित होतोय कारण अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी ठाकरे बंधूंच्या युतीकडे डोळे लावून आहेत. कुणी फलक लावून ठाकरे बंधूंना साद घालतंय तर कुणी देवाजवळ साकडं घालतंय.







