गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे FDA ठाणे विभागाने 9 सप्टेंबर बुधवारी रोजी शिळ-दिवा रोडवरील खर्डी गाव परिसरातील भास्कर कम्पाऊंड येथे अचानक छापा टाकला. फरसाण, वेफर्स, चिवडा, नमकीन आणि अन्य खाद्यपदार्थांचं उत्पादन किंवा विक्री करणाऱ्या तब्बल 11 आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
28,955 किलो आणि 56 लिटर इतका साठा जप्त
कारवाईदरम्यान विविध आस्थापनांमध्ये बटाटा वेफर्स, फराळी चिवडा, तिखा वेफर्स, काळी मिरी वेफर्स, मिक्स फरसाण, शेव, भाकरवडी, चिवडा, डाएट चिवडा, शेजवान स्टिक्स आणि केळीचे चिप्स आढळले. याशिवाय उत्पादनासाठी वापरण्यात येणारे मैदा, बेसन, वाटाणा पीठ, पामोलिन तेल आणि वापरलेले काळंकुट्ट खाद्यतेलही साठवून ठेवण्यात आलं होतं. तपासणीदरम्यान 28,955 किलो आणि 56 लिटर इतका साठा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत तब्बल 20,48,801.50 रुपये असल्याचं FDAने सांगितलं आहे. भेसळ किंवा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून तसेच अत्यंत अस्वच्छ व असुरक्षित ठिकाणी उत्पादन होत असल्यानं हा साठा अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत जप्त करण्यात आला.
चिकट फरशी अन् झुरळे व उंदरांचा वावर
FDAच्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी देखील समोर आल्या आहेत. काही आस्थापनांकडे आवश्यक वैध अन्न परवाना नव्हता. उत्पादन क्षेत्रातील फरशी घाणेरडी आणि चिकट होती. साचलेलं तेल आणि अन्य अवशेषांमुळे परिसर दूषित झाल्याचं आढळलं. काही ठिकाणी छप्पर आणि भिंती तात्पुरत्या पत्र्यांच्या शेडच्या होत्या, तर उत्पादन क्षेत्राचा काही भाग उघडाच होता. सांडपाण्याचा योग्य निचरा नसल्यानं आस्थापनांबाहेर दुर्गंधी पसरल्याचंही तपासणीत दिसून आलं. काही ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात झुरळे व उंदरांचा प्रादुर्भाव आढळला. बाहेरील परिसरात गायी, कुत्रे आणि मांजरींचाही वावर होता. पॅकबंद खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्ये लागू नियमांचं पालन होत नसल्याचंही FDAच्या निदर्शनास आलं. खाद्यपदार्थ तयार करणारे काही कामगार अप्रोन, हातमोजे आणि टोपी न वापरता अस्वच्छ कपड्यांमध्ये काम करत होते. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत 11 आस्थापनांना काम बंद करण्यासाठी परवाना किंवा नोंदणी निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्याचं नमूद
शिळ-दिवा रोडपुरती ही कारवाई मर्यादित नव्हती तर,मुंबईतील श्री गजानन वडापाव-स्नॅक्स सेंटर, समर्थ स्वीट्स, एकविरा झुणका भाकर केंद्र, मनीषा स्वीट्स, नवाब सीख कॉर्नर, हॉटेल अदिन आणि जय महाराष्ट्र मसाला डोसा कॉर्नर यांसारख्या आस्थापनांच्या तपासणीतही विविध स्वच्छता आणि अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
तुकाराम मुंढेंचा कडक इशारा
सण, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उरूस आदी प्रसंगी महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर, भंडारा किंवा अन्य जिथे अशापद्धतीने सामूहिक अन्नवाटपाचं आयोजन होत असेल तिथे आता FDA ची करडी नजर असणार आहे. तिथे त्रुटी आढळल्या तर त्यांचे परवाने थेट रद्द केले जाणार आहेत. एवढंच नाही तर, परवानाधारक केटर्स किंवा स्वयंपाकगृहामार्फत अन्न तयार व वितरित केले जात असल्यास कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी विहित पूर्वसूचना सादर करणे आवश्यक असल्याचं FDAने सांगितलं आहे. यासाठी Food & Drug Grievance Portal वर ‘सामूहिक अन्नवाटप पूर्वसूचना नमुना’ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नागरिकांसाठी टोल-फ्री नंबर
अन्नाच्या गुणवत्तेबाबत किंवा गैरप्रकाराबाबत काही आढळल्यास नागरिकांनी थेट टोल-फ्री नंबरवर कॉल करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. संपर्क क्रमांक असणार आहे 1800222365. या नंबरवर नागरिकांना तक्रार करता येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.








