मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळात बोलणी फिस्कटल्याचं बोललं जात आहे. जरांगे आणि सरकार यांच्यातील चर्चेमध्ये एकमत होताना दिसत नाहीये.जरांगे यांनी आंतरवाली सराटीतून त्यांनी काल सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईत धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला. मुंबईत मराठा आंदोलकांसह जाणार असल्याचं जरांगेंनी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे सरकार आणि जरांगेमधील विसंवादाची दरी वाढल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत मराठा मोर्चा धडकणार
मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं.आता माघार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईत कधी जायचं याचा मुहूर्त म्हणजेच त्याची तारीख ठरणार आहे. याविषयीची माहिती जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना थोड्यावेळापूर्वी दिली.
शिबिरं नेमकं कशासाठी?
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात आयोजित केल्या जाणाऱ्या तपासणी शिबिरांच्या उद्देशावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचसोबत त्यांनी आंदोलकांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरही तीव्र शब्दांत सरकारवर निशाणा साधला आहे.ते म्हणाले की, “आपलं आपल्याला मिळत नाही. सरकार जाणून बुजून हे करणार आहे. हे शिबिर फक्त आंदोलनापुरतं राबवलं जाणार आहे की आणखी काही उद्देशाने किंवा मिळालेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी हे शिबीर काही जणांच्या सल्ल्याने ठेवलं आहे ते बघू” असा संशय व्यक्त करत जरांगेनी सरकारवरच तोफ डागली.
सरकारच्या शिष्टमंडळावर निशाणा
पुढे ते म्हणाले, “3 वर्षात मी कुणाचीही वाट बघितली नाही. मी माझ्या जीवावर आंदोलन करतो यायचं तर या. मुंबईत आम्ही जाणारच. 12 तारखेला जाहीर करणार. सरकारला मार्गदर्शकाच मार्गदर्शन गरजेचं आहे की तोडगा चांगला आहे. हे त्यांना कळेल. माझं कर्तव्य मि पार पडत आहे. मी लढायचं ठरवलं आहे. त्यांच्याजवळचे 2-3 जण चांगले आहे. यांच्या सल्लागाराचे नाव आम्हाला माहीत झाले आहेत,” अस म्हणत जरांगे टोला लगावला.
शिंदे-शिरसाट यांच्यावर टीका
“आधी चांगली भाषा वापरत होतो. 3 वर्ष शिंदेंना चांगला बोललो. पण आता हे जातीच्या नाही पक्षाच्या बाजूने बोलत आहे. शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदें आणि माझे संबंध खराब झाले. जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात.सरकारला नाही तुम्हाला शिव्या दिल्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चूक केली त्यामुळे बोलणार. मी पक्षाच्या नाही जातीच्या बाजूने बोलणार” असेही जरांगे पाटील म्हणाले.
जरांगेंनी त्यांची प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडून अखेर मराठ्यांचे भगवं वादळं लवकरच मुंबईत येऊन धडकरणार असल्याचं जरांगेंनी ठणकावून सांगितलं.त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या दिवसांत मुंबईत काय चित्र पाहायला मिळणार, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे .








