मालाड (प.) | प्रतिनिधी
मढ बीचवर शनिवारी सायंकाळी समुद्रात बुडालेल्या १७ वर्षीय तन्मय विपुल तालुकदार या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी वटार गल्ली परिसरात आढळून आला. मात्र मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी पोलिसांनी कुटुंबाकडून तब्बल ८५०० रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तन्मय हा शनिवारी सायंकाळी आपल्या तीन मित्रांसह मढ बीचवर पोहण्यासाठी गेला असता समुद्राच्या प्रवाहात ओढला गेला होता. तो बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यानंतर तीन दिवस त्याचा शोध सुरु होता. अखेर सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह वटार गल्ली भागात सापडला.
या दुर्घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, मृतदेह रुग्णालयात हलवण्यासाठी मालवणी पोलीस ठाण्यातील ‘मोरे’ या कर्मचाऱ्याने १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तन्मयच्या नातेवाईकांनी केला. मोठ्या विनवण्या व वादानंतर ८५०० रुपये देऊनच मृतदेह शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
तिन्ही दिवस उपाशी राहिलेल्या आणि मानसिक धक्क्याने कोलमडलेल्या तन्मयच्या आईला बीचवरच बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी कुठल्याही प्रकारची तत्काळ सरकारी मदत किंवा समुपदेशनाची व्यवस्था नव्हती, हे विशेष.
एकीकडे सरकार मोफत रुग्णवाहिका सेवा देत असल्याचे जाहिरातींमधून वारंवार सांगते, तर दुसरीकडे मृतदेहावरही पैसे उकळले जात असल्याचे चित्र मुंबईसारख्या महानगरात पाहायला मिळत आहे.
या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांना देण्यात आली असून, त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या ८५०० मध्ये कोणी भागीदारी होते की, खरंच त्याची चौकशी केली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.अशा घटना मुंबई शहरात घडत असतील तर पूर्ण राज्यातील खेड्या गावातील स्थिती काय असणार.खरं तर हा प्रकार पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून मुख्यमंत्री आणि गृहखात्याचे डोळे उघडण्याची गरज आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांचा जीव जातो, आणि मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांची पिळवणूक होते, ही बाब अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर आहे
अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत रहा जागृत









