कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील शाळकरी मुलींनी छत्रीला माईक बनवून पत्रकाराच्या भूमिकेत आपल्या गावातील खड्डेमय रस्त्याचा जो ग्राऊंड रिपोर्ट केला होता तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.त्यांचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही तासातच तो रस्ता दुरूस्तही करण्यात आला. शाळकरी मुलांच्या या धाडसाचे सर्वांनीच कौतुक केलं. पण आता या मुलींच्या या धाडसामुळे इतर शहरातील शाळकरी मुलांनी आपापल्या गावातील रस्त्याची समस्या समोर आणण्यास सुरुवात केली आहे तेही अगदी बिनधास्त.
कर्जतच्या या ‘सकारात्मक पॅटर्न’चा आदर्श
कर्जतच्या शाळकरी मुलींच्या त्या व्हिडीओनंतर ग्रामीण भागातील चिमुकल्यांना एक नवीन ऊर्जा दिली आहे. कर्जतच्या या ‘सकारात्मक पॅटर्न’चा आदर्श घेत आता नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शाळकरी मुलेही आक्रमक पत्रकाराच्या भूमिकेत उतरली असून, त्यांनी आपल्या गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेची पोलखोल केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी आणि गोहिरेवाडी येथील शाळकरी मुलांनीही तशाच प्रकारे रस्त्यांच्या वाईट आणि दयनीय अवस्थेवर थेट ग्राऊंड रिपोर्ट करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत ही चिमुकली पाण्याच्या प्लास्टीक बॉटलचा माईक करून रिपोर्टिंग करताना दिसत आहेत.
प्लास्टीक बॉटलचा माईक करून रिपोर्टिंग
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांनी प्रशासनाच्या लापरवाह कारभाराविरुद्ध सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत हा मार्ग स्वीकारला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील पेगलवाडी व गोहिरेवाडी येथील रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, साचलेले पाणी आणि चिखलाचे साम्राज्य मुलांनी कॅमेऱ्यात कैद केलं.खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, हेच समजत नाही अशी बिकट अवस्था या विद्यार्थ्यांनी आपल्या रिपोर्टिंगमधून दाखवून दिली आहे. रोज शाळेत जाताना विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना किती त्रास सहन करावा लागतो, याची गंभीर समस्या त्यांनी मांडली आहे. हा व्हिडीओ देखील असाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
स्थानिक प्रशासनावर प्रचंड दबाव
कोकण आणि कर्जतच्या धर्तीवर आता नाशिकच्या ग्रामीण भागातही मुले पत्रकार बनून प्रश्न विचारू लागल्याने स्थानिक प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या सर्जनशील आणि लक्षवेधी व्हिडीओंमुळे लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली
कर्जतमध्ये ज्याप्रमाणे प्रशासनाने काही तासांत रस्ता दुरुस्त केला, तसाच तत्परता नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दाखवावी, अशी जोरदार मागणी पेगलवाडी आणि गोहिरेवाडीतील ग्रामस्थ करत आहेत. लहान मुलांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, ही चिमुकली आता प्रशासनाला काम करण्यास भाग पाडत आहेत, अशी चर्चा रंगली आहे.








