बॉलिवूडप्रमाणेच आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांमधील घटस्फोटाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. नुकतंच मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं वेगळं झालं आहे. लग्नाच्या १५ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. आदिनाथ आणि उर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाबाबतची एक पोस्ट करून त्यांनी चाहत्यांना धक्काच दिला आहे.
अखेर नात्याला पूर्णविराम
दरम्यान आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्यात अलबेल नसल्याची चर्चा तशी बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. अखेर त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे.आदिनाथ आणि उर्मिला यांनी त्यांच्या नात्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊन चाहत्यांनाही विचारत पाडलं आहे.गुरुवारी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची चाहत्यांना माहिती दिली. दोघांनीही एकमेकांबद्दल आदर कायम ठेवत पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची मुलगी जिजासाठी मात्र दोघेही सह-पालकत्वाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“खूप विचार केल्यानंतर, आम्ही…” पोस्ट चर्चेत
2025 पासूनच आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती. सोशल मीडियावर आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरतेय. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय “खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत.” असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत चाहत्यांना ही माहिती दिली.

पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला
आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज होतं. उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. मात्र आता या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.










