छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन व दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना) च्या संयुक्त विद्यमाने “मी लोकशाहीचा पाठीराखा असून कोणत्याही आकारात आणि पद्धतीत असलेल्या एखाधिकारशाहीचा विघ्वंसक आहे.” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गोलमेज परिषदेतील विधानाच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त सदरील ऐतिहासिक प्रासंगिक विषयावर १५३ वी शतकोत्तर वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संस्थेचे कार्यालय साकेत नगर, छत्रपती संभाजीनगर येथे १८ जानेवारी २०२६ ला संपन्न झाली.
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे संचालक बी.बी. मेश्राम म्हणाले की, १९ जानेवारी १९३१ ला गोलमेज परिषदेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले होते की, एखाद्या देशाच्या राजकीय जीवनाचे सुसूत्रीकरण करण्याचे प्रयत्न करीत असताना उत्तरदायी शासन आणि प्रातिनिधिक सरकार या दोन बाबींना प्राथमिकता दिली पाहिजे. कुठल्याही देशातील जनतेवर राज्य करीत असताना जनतेला दारिद्र्यात ठेवून राज्य करणे आणि जनतेला दारिद्र्यातून बाहेर काढून राज्य करणे या दोन भिन्न बाबी आहेत. म्हणून जनतेने सभागृहात सक्षम प्रतिनिधी पाठविले पाहिजेत आणि त्या पुढार्यावरती जनतेने करडी नजर ठेवली पाहिजे. हे करण्यासाठी अज्ञानी जनतेला जागृत करून सज्ञानी बनविणे हे आपले उद्दिष्ट असायला हवे. करिता समग्र आंबेडकरवाद जनमानसावर बिंबविला पाहिजे. कुटुंब हा समाजाचा प्रमुख घटक असल्यामुळे ज्याची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे. लोकशाहीची स्पष्टता कुटुंबातील सदस्यांना यावी म्हणून कुटुंबात संसदीय प्रणाली राबविली पाहिजे. समतायुक्त मानवतावादी समाज निर्माण करण्यासाठी देशव्यापी परिवर्तनवादाची चळवळ चालवीत असताना दक्षिण भारतात होऊन गेलेल्या आदर्शांना उत्तर भारतात तर उत्तर भारतात होऊन गेलेल्या आदर्शंना दक्षिण भारतात प्रचारीत आणि प्रसारित केले पाहिजे. तसेच २२ डिसेंबर १९५२ ला पुण्याच्या लाल लायब्ररीमध्ये दिलेल्या संदेशात या देशांमध्ये संसदिय लोकशाही टिकवायची असेल तर कुठल्या अटी आणि शर्ती यांचे पालन केले पाहिजे हे स्पष्ट केलेले आहे. त्याचे आपण अंमलबजावणी केली पाहिजे. जेणेकरून भारतीय नागरिकांचे परिवर्तनवादाच्या अनुषंगाने जनमत तयार होऊ शकेल. या बाबीचे समाज जीवनात संचलन व्हावे, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मी लोकशाहीचा पाठीराखा असून कोणत्याही आकारात आणि पद्धतीत असलेल्या एकाधिकारशाहीचा विघ्वंसक आहे, असे म्हटले होते. याची जनतेला प्रचिती यावी म्हणून आपण या प्रासंगिक विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे.
उद्घाटनपर मार्गदर्शन करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे समन्वयक उद्योजक शशिकांत काळे म्हणाले की, नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत बिनविरोध प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेवरून असं लक्षात येते की येणाऱ्या लोकसभेमध्ये सुद्धा खासदार बिनविरोध निवडून पाठविले जातील की काय? अशी शंकास्पद परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्यातील काही नेते मंडळी शत्रू सोबत हात मिळवणी करून चळवळीचे नुकसान करून घेत असतात. याची जाणीव ठेवून आपण मार्गक्रमण केले पाहिजे.
प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ॲड. सुनील कुमार नागवंश म्हणाले की, ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले असले तरी त्यांनी आपणास शिक्षणाची द्वारे खुली करून मानवी हक्क अधिकाराची जाणीव करून दिलेली आहे. या देशाला न्याय देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरच करू शकतात, याची जाणीव असल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना गोलमेज परिषदेत बोलावले होते. ज्यात आंबेडकरांनी आपले म्हणणे सभागृहाला पाठवून दिले ज्याला केवळ गांधींनी विरोध केला होता. परिणामी पुणेकरारातील तडजोडीनुसार स्वतंत्र मतदार संघाऐवजी नाईलाजाने संयुक्त मतदार संघ पद्धती स्वीकारावी लागले. करिता शिकल्या सवरलेल्या व्यक्तींनी राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये.
याप्रसंगी महादेव डांबरे म्हणाले की, आपण साउथ बरो व सायमन कमिशन आणि गोलमेज परिषदेतील कार्यवाही समजून घेतली पाहिजे. डॉ. व्ही. एच. कांबळे म्हणाले की, चळवळीसाठी संसाधने उपलब्ध करून दिली पाहिजेत. ॲड. आर. एम. गायकवाड म्हणाले की, समाजातील कुठल्याही घटकाला दुर्लक्षित न करता सर्व वयोगटासाठी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. कुटुंब हाच लोकशाहीचा प्रमुख घटक आहे. प्रा. डॉ. ए. आर. केवटे म्हणाले की, आपले विचार आणि आचरण हे पारदर्शक असावे. शासन प्रशासनावर परिणाम करणारी व्युहरचना असावी. उद्योजक मिलिंद बागुल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून लोकशाहीचा पाठीराखा घोषित करताना एकाधिकारशाहीचा विघ्वंसक असल्याचे सिद्ध केले. ॲड. विलास रामटेके म्हणाले की, चर्चेशिवाय निर्णय घेणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे होय.
याप्रसंगी प्रा. शिवम गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. सुरुवातीला आदर्शांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करून स्टडी फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. ॲड. विलास रामटेके यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक प्रा. विलास कटारे यांनी व आभार प्रा. शिवम गायकवाड यांनी व्यक्त केले.









