भष्टाचार प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतोय. मग ती कोणती नोकरी असो किंवा कोणती परीक्षा. घोटाळेबाज सगळीकडेच असतात. पण नेहमी इतरांचे घोटाळे आणि गुन्हे उघडकीस आणणारेच घोटाळेबाज निघाले तर. होय, मुंबई पोलिस दलातच तब्बल साडेसहा कोटींचा घोटाळा झाला आहे.पोलिसांचे वेतन म्हणजे पगार काढणाऱ्या मंत्रालयीन लिपिक आणि अधिकाऱ्यांनीच शासनाच्या तब्बल साडेसहा कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात ५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोटाळा झाला कसा?
पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डेटा जुन्या ‘सेवार्थ’ प्रणालीतून नव्या प्रणालीत म्हणजे एका सिस्टममधून दुसऱ्या सिस्टममध्ये ट्रान्सफर करताना या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयात पोलिसांचे पगार काढण्याचे काम चालते. येथील मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी जे लोक पोलिस दलातच नाहीत, अशा ८ ते १० बोगस व्यक्तींना ‘पोलिस कर्मचारी’ म्हणून दाखवले. केवळ इतकेच नाही, तर त्यांच्या नावावर बँक खाती उघडून शासनाकडून त्यांचे नियमित पगारही काढले.
ऑडिटमुळे चोरी समोर
या सर्व प्रकाराबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचे ऑडिट केले. या ऑडिटमध्ये पगाराच्या रकमेत मोठी तफावत आढळली. ज्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये पगारापोटी जमा झाले, त्यांची नावे तपासली असता ते कोणीही पोलिस दलात कार्यरत नसल्याचच समोर आलं.
या बोगस पोलिसांच्या नावे काढण्यात आला पगार
घोटाळा करणाऱ्या पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या नावांवरून हे पगार काढले जात होते. हे लोक नेमके कोण आहेत आणि त्यांचे या अधिकाऱ्यांशी काय संबंध आहेत, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
या पाच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल
उत्तर प्रादेशिक विभागातील पोलिस निरीक्षकांच्या तक्रारीवरून समतानगर पोलिस ठाण्यात फसवणूक, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, प्रमुख लिपिक अजय राठोड, आणि वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम या ५ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे








