मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी ५८ लाख मराठा नोंदी कायम ठेवल्या जातील आणि हैदराबाद गॅझेटमध्ये सुधारणा केली जाईल याची हमी मिळवण्यावर भर दिला आहे.
समाजाच्या हितासाठी माघार घेतल्याचं जरांगेंनी म्हटलं
या संदर्भात बोलताना जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, ५८ लाख नोंदींमधून एकही नोंद कमी होणार नाही, याची खात्री देणे महत्त्वाचे होते. तसेच, हैदराबाद गॅझेटचा सुधारित जीआर काढण्यास सरकार तयार झाले आहे, हे मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाच्या हितासाठी काही वेळा माघार घेणे आवश्यक असते, असे सांगत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सामान्य माणूस म्हणून लढत राहू, असंही ते म्हणाले.
सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगेंची भेट
सरकारच्या शिष्टमंडळाने बीडमधील पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रसाद लाड आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. यानंतर सकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन उपोषण सोडल्याची घोषणा करण्यात आली. मुंबईत गेलेल्या आंदोलकांनी परत यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
सरकारला तीन महिन्यांचा वेळ
सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला. या काळात मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही मुंबई गाठणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. उपोषण आज स्थगित करत असलो तरी आंदोलन सुरूच राहणार, असेही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२० दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावली
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपले २० दिवसांचे उपोषण सोडल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी उपचाराची आवश्यकता सांगितल्यानंतर जरांगे पाटील आता बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. जिथे त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले जातील.
हात-पाय हलवणे देखील कठीण झाले होते
मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघालेले असताना पाटोदा येथे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे पाटोदा येथे विठ्ठल मंदिराच्या भक्तनिवासमध्ये त्यांना सलाईन लावण्यात आले. अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर, १२ सप्टेंबरपासून त्यांनी सलाईन घेणे बंद केले होते. त्यांना हात-पाय हलवणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत, अशी मागणी मराठा समाजातील आंदोलक करत होते.
या प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. वैद्यकीय सल्लागार त्यांच्या आरोग्याची सातत्याने दखल घेत होते. प्रकृती खालावल्याने आणि डॉक्टरांच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. उपोषण संपवल्यानंतर आता ते उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाच्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातील अशी माहिती मिळाली आहे.








