गणेशोत्सवाच्या तोंडावर बोरीवली येथील वीर सावरकर उद्यानातील तलावात गणेशमूर्ती विसर्जनावर लावण्यात आलेल्या बंदीमुळे स्थानिक भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याप्रकरणी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुढाकार घेत बोरीवलीचे पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांना पत्र लिहून या समस्येकडे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष वेधले आहे.
बोरीवली येथील प्रसिद्ध वीर सावरकर उद्यानातील तलावात गणेशमूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादंगावर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांना थेट पत्र पाठवून पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षम व समन्वयाचा अभाव असलेल्या कार्यपद्धतीवर तीव्र दुःख व नाराजी व्यक्त केली आहे.
न्यायालयीन आदेश किंवा शासनाचे नियम स्पष्ट नसताना धार्मिक उत्सवांच्या वेळी सरसकट बंदी घालणे अयोग्य असून, यामुळे समाजात अनावश्यक तणाव निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. २००६ पासूनची परंपरा आणि ऐतिहासिक संदर्भ पोलीस उपायुक्तांना दिलेल्या पत्रात गोपाळ शेट्टी यांनी वीर सावरकर उद्यानाच्या निर्मितीचा आणि तलावातील विसर्जन परंपरेची सविस्तर माहिती दिली.
उद्यानाची निर्मिती व उद्घाटन, विसर्जनाची सुरुवात
२००६ मध्ये आमदार असताना बोरीवलीत वीर सावरकर उद्यानाची पायाभरणी करण्यात आली. सन २००८ मध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या उद्यानाचे लोकार्पण झाले होते. उद्यानाच्या निर्मितीनंतर स्थानिक नागरिक व चौगुले कुटुंबाच्या आग्रही मागणीवरून, तसेच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या राष्ट्रीय भावनेचा आदर ठेवून या तलावात विसर्जनाची सुरुवात करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हजारो नागरिक येथे श्रद्धेने विसर्जन करत आहेत.
कृत्रिम तलावाचे भूमिपूजन अन् संताप
यावर्षी महापालिकेने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा लेखी पत्राशिवाय विसर्जनास अचानक बंदी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. गणेश विसर्जनाच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी स्थानिक नगरसेविकेच्या उपस्थितीत उद्यानात कृत्रिम तलाव उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. माहिती मिळताच गोपाळ शेट्टी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली व कायदेशीर बाजू मांडली.
गोपाळ शेट्टी यांनी घटनास्थळी जाऊन नैसर्गिक तलावांची यादी सादर केली
विसर्जनाच्या संध्याकाळी पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली असता गोपाळ शेट्टी यांनी घटनास्थळी जाऊन नैसर्गिक तलावांची यादी आणि झाशीची राणी तलावासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाचे दस्तऐवज अधिकाऱ्यांसमोर सादर केले. अखेर आर-मध्य विभागाचे म्हणजे (R-Central Ward) सहाय्यक आयुक्त डॉ. प्रफुल दिनेश तांबे यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी केली आणि वस्तुस्थिती समजून घेत योग्य भूमिका घेतल्याने हा वाद शांत झाला, अशी माहिती पत्रात देण्यात आली आहे.
भविष्यात संवाद आणि समन्वय राखण्याचे आवाहन
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या नाहक वादावर नाराजी व्यक्त करताना गोपाळ शेट्टींनी असंही म्हटलं आहे, की “कोणताही सण किंवा उत्सव असो—भारतीय संविधान, न्यायालयीन आदेश आणि शासनाच्या नियमांचे पालन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. परंतु, कोणत्याही धार्मिक सणांच्या आयोजनात निर्बंध किंवा बंदी आणण्यापूर्वी स्थानिक संस्था, आयोजक आणि नागरिकांशी प्रशासनाने पूर्वसंवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने योग्य समन्वय ठेवावा.” या पत्रासोबत सर्व संबंधित कायदेशीर कागदपत्रे जोडण्यात आली असून, पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन आवश्यक त्या सूचना जारी कराव्यात, अशी मागणी गोपाळ शेट्टी यांनी पत्राच्या शेवटी केली आहे.
शासकीय नियमांनुसार विसर्जनाचे प्रमुख मुद्दे
६ फुटांखालील मूर्तींसाठी बंदी
शासन निर्णयानुसार ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या POP आणि NON-POP अशा सर्व मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करता येणार नाही.
बड्या मूर्तींसाठी सवलत
इतर पर्याय उपलब्ध नसल्यास, केवळ सार्वजनिक मंडळांच्या ६ फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींनाच नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्याची मुभा देण्यात आली आहे.
प्रशासकीय उपाययोजना
स्थानिक स्वराज्य संस्थांनी घरगुती व लहान मूर्तींसाठी पुरेशा प्रमाणात कृत्रिम तलाव उभारणे, स्वतंत्र नोंदणी कक्ष स्थापन करणे आणि निर्माल्य व्यवस्थापन करणे अनिवार्य केले आहे. बोरीवली येथील वीर सावरकर उद्यानातील तलावाबाबत निर्माण झालेल्या बंदीच्या मुद्द्यावर प्रशासनाने योग्य मार्ग काढून भाविकांची सोय करावी आणि न्यायालयाच्या नियमांचे पालन करून विसर्जन सुलभ करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होत असल्याने यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर व स्थानिक प्रशासनासमोर आहे.








