मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. काल म्हणजे १५ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. त्यांचा आजचा उपोषणाचा १९ वा दिवस असून त्यांनी उपचारही बंद केले आहेत.पाणी आणि सलाईन घेणे बंद केल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत असल्याचे वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती चिंतेचा विषय
काल सुमारे 13 तासांचा प्रवास करून जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरात पोहोचले. या ठिकाणी पहाटे जवळपास अडीच वाजता त्यांनी मराठा बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांची प्रकृती तपासली. उपोषणाला परवानगी नसतानाही मुंबईला जाण्यावर ते ठाम आहेत. आज ते बीडच्या पाटोद्यातून अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथे मुक्काम करणार आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती महाराष्ट्रात चिंतेचा विषय बनली आहे.
अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही
पण याचदरम्यान, जरांगे पाटील यांच्यावर काही मञ्यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगे सरकार आणि मंत्र्यांवर टीका करण्यासाठी जी भाषा वापरत आहेत, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा मंत्री आक्रमक झाले. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जरांगे पाटील हे जी भाषा वापरत आहेत, ती भाषा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. गुलाबराव पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, गिरीश महाजन, संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका मांडली.
जशास तसे उत्तर दिले जाईल
जरांगे पाटील यांनी सरकावर बोलल्यास खपवून घेतले जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली. तसेच सरकाराला सर्व समाजातील विद्यार्थ्यांना, तरुणांना मदत करायची आहे. मात्र, असेच सुरू राहिले तर सरकारची प्रतिमा नकारात्मक निर्माण होईल, असा सूर देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला.
जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली
मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीहून निघण्यापूर्वीच उपचार घेण्यास नकार दिला होता. काल रात्री त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. त्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांनी पाटोदा येथे देखील उपचार घेण्यास नकार दिला. उपोषणामुळे प्रकृती साथ देत नाही आपण दौऱ्या रद्द करून एकटेच मुंबईला जाऊ, असं म्हणत ते स्वत:च निघाले आहेत.








