‘ईशय गंभीर’मधील पोपटलाल ठरला टिटवाळ्याचा जनआवाज http://टिटवाळा
टिटवाळा : स्थानिक राजकारणात नेहमीच गंभीर चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते. मात्र याच गंभीरतेला विनोद, विडंबन आणि बोचऱ्या वास्तवाची धार देत ‘ईशय गंभीर’ या सदरातून सोशल मिडीयाच्या माध्यमातून उभा राहिलेला पोपटलाल हा कॅरेक्टर सध्या टिटवाळा परिसरात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिक घडामोडींवर हलक्याफुलक्या शैलीत, पण नेमक्या शब्दांत भाष्य करणाऱ्या पोपटलालने गेल्या काही दिवसांत नागरिकांच्या मनावर ठसा उमटवला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा विभागात उमेदवारांच्या चर्चा, राजकीय डावपेच आणि पडद्यामागील हालचालींना वेग आला असताना पोपटलालने या सगळ्यावर विडंबनात्मक भाष्य करत जनतेसमोर एक वेगळाच आरसा धरला. हसत-हसत, पण डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी त्याची शैली लोकांना भावली. स्थानिक राजकारणातील वेगाने घडणाऱ्या घडामोडींवर तितक्याच वेगाने सतत अपडेट देत , एखादी घडामोड घडल्यानंतर काही सेकंदातच त्याने केलेले परखड भाष्य केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता विचार करायला लावणारे ठरले.
गेल्या पंधरा दिवसांत पोपटलालची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. सोशल मीडियावर ‘ईशय गंभीर’ या सदरातील व्हिडिओ, पोस्ट आणि चर्चा मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, नागरिकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. राजकारणावर थेट टीका न करता, विनोदाच्या आडून वास्तव मांडण्याची पोपटलालची हातोटी लोकांना आवडत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेकदा थेट बोलण्यापेक्षा विडंबन जास्त प्रभावी ठरते, याचा प्रत्यय या पात्राने दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांकडून पोपटलालच्या भूमिकेचा आवाका वाढवावा, अशी मागणी होत आहे. केवळ राजकारणापुरतेच नव्हे तर समाजातील इतर ज्वलंत प्रश्न, सामान्य माणसाच्या अडचणी, व्यवस्था आणि प्रशासनातील त्रुटींवरही पोपटलालने भाष्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘ईशय गंभीर’ हे सदर सोशल मीडियावर नियमितपणे सुरू ठेवावे आणि त्यातून समाजप्रबोधनाची भूमिका अधिक ठळकपणे मांडावी, अशीही प्रतिक्रिया पुढे येत आहे.
हसत हसत वास्तव सांगणारा पोपटलाल सध्या टिटवाळ्याच्या स्थानिक चर्चांचा केंद्रबिंदू ठरला असून, राजकारणातील गंभीरतेला विडंबनाची धार देणारा हा प्रयोग पुढे कोणती दिशा घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सगळ्या चर्चेत आणखी एक रंजक बाब म्हणजे पोपटलालने काही स्थानिक राजकारण्यांना दिलेली विनोदी टोपणनावे. कुणावरही थेट टीका न करता, हसत-हसत ठेवलेली ही नावे इतकी नेमकी आणि बोलकी ठरली की तीच आता टिटवाळा परिसरात ओळखीची बनली आहेत. चौकाचौकांत, चहाच्या टपऱ्यांवर आणि सोशल मीडियावर ही नावे चर्चेचा विषय ठरत असून, मूळ नावांपेक्षा ही टोपणनावेच जास्त वापरली जात आहेत. विडंबनाच्या आडून व्यक्तिमत्त्व, भूमिका आणि राजकीय स्वभाव अधोरेखित करणारी ही शैली लोकांना भावली आहे. त्यामुळे राजकारणातील गंभीर चेहरे विनोदाच्या आरशात दिसू लागले असून, या नावांनीच संबंधितांची प्रतिमा लोकांच्या मनात ठसली आहे. हेच पोपटलालच्या भाष्याचे आणि ‘ईशय गंभीर’च्या प्रभावाचे मोठे यश मानले जात आहे.
या चर्चेच्या केंद्रस्थानी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो, तो म्हणजे पोपटलाल या पात्राच्या माध्यमातून ईशय गंभीर हे सदर चालवणारे टिटवाळ्याचे स्थानिक पत्रकार अजय शेलार हे गेली तब्बल पंचवीस वर्षे अजय शेलार आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने भाष्य करत आहेत. केवळ बातम्या देण्यापुरते न थांबता त्यांनी पत्रकारितेला जनसामान्यांचा आवाज बनवले आहे. दुर्लक्षित घटकांच्या समस्या, प्रशासनातील त्रुटी, अन्याय आणि विसंगती यांना त्यांनी आपल्या लेखनातून ठामपणे वाचा फोडली.
अजय शेलार यांच्या पत्रकारितेची ओळख ही निर्भीडपणा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी अशी आहे. लोकांच्या दैनंदिन अडचणी, नागरी प्रश्न, पायाभूत सुविधांचा अभाव असो वा स्थानिक पातळीवरील अन्यायकारक निर्णय—या सर्व विषयांना त्यांनी आपल्या लेखणीतून न्याय दिला. जनसामान्यांच्या वेदना आणि अपेक्षा शब्दांत उतरवत त्यांनी अनेक प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आणि प्रशासनाला जागे करण्याचे काम केले.
पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या प्रवासात अजय शेलार यांनी कधीही तडजोड न करता सत्य मांडण्यावर भर दिला. त्यामुळेच टिटवाळा परिसरात त्यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून नव्हे, तर समाजहितासाठी लढणारा सजग आवाज म्हणून निर्माण झाली आहे. आज ईशय गंभीर’सारख्या विडंबनात्मक माध्यमांतून समाज आणि राजकारणावर भाष्य होत असताना, त्या पाठीमागे उभ्या असलेल्या निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपण्याचे काम अजय शेलार यांसारख्या पत्रकारांनी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे केले आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.










