सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक धरणे फुल्ल भरले असून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरांना दिलासा मिळत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचे हे हवामान महाराष्ट्रात कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यातच आता जालना, नांदेड आणि धुळ्यात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. या शहरांमध्ये नदी प्रवाह सामान्यपेक्षा अनेक पट वाढण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जालना, नांदेड आणि धुळे जिल्ह्यांमध्ये अचानक पुराचा धोका
मंगळवार, ०४ ऑगस्ट, २०२६ रोजी जालना, नांदेड आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये अचानक पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार, या भागांमधील नद्यांचा प्रवाह सामान्य पातळीपेक्षा लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. जालना येथे नदीचा प्रवाह सामान्यपेक्षा ५.९ पट अधिक राहण्याचा अंदाज असून, ५ मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेडमध्ये हा प्रवाह ५.० पट आणि धुळे येथे २.९ पट राहण्याची शक्यता आहे, तर अनुक्रमे ४ मिमी आणि ३ मिमी पावसाचा अंदाज आहे.
नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन
या अलर्टमुळे, नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहावे. पाणी साचण्याची शक्यता असल्याने, अनावश्यक प्रवास टाळावा. नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो. सर्व नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.
घरातून बाहेर पडताना किंवा प्रवास करताना सुरक्षिततेची खात्री करा
नदीकाठच्या सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अचानक पाणी वाढल्यास जलमय परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे घरातून बाहेर पडताना किंवा प्रवास करताना सुरक्षिततेची खात्री करा. कमी उंचीच्या किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळावे.अस आवाहन करण्यात आलं आहे.
जालना धुळे सह या जिल्ह्यांनाही अलर्ट?
४ ऑगस्ट रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, साताऱ्यासह घाटमाथ्यावरील भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणासह दक्षिण कोकण आणि गोवा येथे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याच्या सुचना
सध्याचे हे अलर्ट नदी प्रवाहाचे अंदाज आणि पर्जन्यवृष्टीच्या अंदाजित आकडेवारीवर आधारित आहेत. हवामानाच्या बदलत्या परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.








