सध्या सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीवरून सोशल मीडियावरून सुरू झालेली आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत धडकलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ सध्या देशातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. इन्स्टाग्रामवरून थेट रस्त्यावरील लढाईत उतरलेल्या या पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
कॉकरोच जनता पार्टी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटले आहेत. 12 वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना करणं जे जमलं नाही, ते कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं. देशाच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. एका अर्थाने या आंदोलनाने इतिहास रचला असं म्हणायला हरकत नाही. पण या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. त्याबद्दल सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे.याबद्दल पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जो निर्णय आहे तो स्पष्टच सांगून टाकला आहे.
अभिजीत दीपकेच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठक
याबबात अभिजीत दीपकेच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठकही सुरु आहे. अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरमध्ये रहायला आहेत. पार्टीची पुढच्या रणनिती काय असणार आहे हे ठरवण्यासाठी अभिजीत दीपकेनं ही बैठक बोलावली असल्याचं म्हटलं जातं.या बैठकीआधी त्याने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्याला विचारलं की, कॉकरोच जनता पार्टी निवडणूक रिंगणात उतरणार का? त्यावर त्याने सध्या काय ठरलय ते स्पष्टपणे सांगून टाकलं.
देशातली सध्या राजकीय स्थिती पाहता…
“मला असं वाटतं की, प्रसारमाध्यमांना जास्त उत्सुक्ता लागली आहे की आम्ही राजकीय पक्ष बनवावा.या देशात जेवढे राजकीय पक्ष आहेत, मला वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्यापासून निराश आहात. आम्हाला ही सामाजिक चळवळच अशीच ठेवायची आहे. देशातली सध्या राजकीय स्थिती पाहता अजून एक राजकीय पक्ष बनवून काय करणार?” असा सवाल अभिजीतने विचारला.
राजकारणावरचा विश्वास उठत चालला आहे
“लोकांचा राजकारणावरचा विश्वास उठत चालला आहे. सकाळी लोक एकाला मतदान करतात, संध्याकाळी सरकार दुसऱ्या पक्षाचं बनलेलं असतं. सकाळी एक आमदार नंतर खासदार बनतो, संध्याकाळी तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो” असं म्हणत अभिजीत दीपके पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांची संख्या सध्या वाढत चाललेली दिसत आहे. तसेच राजकीय पक्ष न बनता सामाजिक चळवळ म्हणून काम चालू ठेवण्याचा निर्धार असल्याचं अभिजीत दीपकेनं म्हटलं आहे.








