अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील निंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद उपक्रम उत्साहात पार पडला. रमणलाल लालचंद सिसोदिया चॅरिटेबल ट्रस्ट व वसंतदादा एज्युकेशन फाउंडेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि साहित्यिक तथा ग्रामीण कवी गोरक्षनाथ कृष्णाजी पवार यांच्या विशेष प्रयत्नातून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
१७८ विद्यार्थ्यांना मोफत शालेय वाटप
रमणलाल लालचंद सिसोदिया चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिकच्या अध्यक्षा मंगलताई सिसोदिया, अर्चनाताई हिरे,सी.ए. वर्धमान सुराणा, तसेच वसंतदादा एज्युकेशन फाउंडेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मिथुन राजाराम चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि साहित्यिक ग्रामीण कवी गोरक्षनाथ कृष्णाजी पवार यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंभारी येथील १७८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार वह्या, पिण्याच्या पाण्याची बाटली, कंपास, खोडरबर, पेन आणि पेन्सिल यांसारख्या रोजच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या वस्तू देण्यात आल्या. हे साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
ग्रामस्थांकडून पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निंभारी ग्रामस्थांनी सर्व मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले. शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या वतीने उपक्रमास उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन भावूक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी रमणलाल लालचंद सिसोदिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मंगलताई सिसोदिया, अर्चनाताई हिरे, सी. ए. वर्धमान सुराणा आणि वसंतदादा एज्युकेशन फाउंडेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मिथुन राजाराम चव्हाण आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना भेटून आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान वाटले” असं मत मंगलताई सिसोदिया (अध्यक्षा, रमणलाल लालचंद सिसोदिया चॅरिटेबल ट्रस्ट) यांनी व्यक्त केलं.
“आजपर्यंत आम्ही ९० विविध गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. आज निंभारी गावात हा उपक्रम राबवताना आम्हाला विशेष आनंद होत आहे” असं मिथुन राजाराम चव्हाण (संस्थापक अध्यक्ष, वसंतदादा एज्युकेशन फाउंडेशन)यांनी म्हटलं आहे.
स्थानिकांचा पुढाकार आणि आभार
आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम निंभारीत आयोजित व्हावा, यासाठी कवी गोरक्षनाथ कृष्णाजी पवार यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांनी आपल्या विनंतीचा मान ठेवून हा उपक्रम राबवल्याबद्दल सर्व दात्यांचे व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ रंगनाथ पवार यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील उत्साह वाढेल असा विश्वास व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचा सांगता समारोप संजय विष्णुदास पवार यांनी मानलेल्या आभाराने झाला.
ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या प्रेरणादायी कार्यक्रमास संजय पवार, संपतराव लक्ष्मण माकोणे, हरी आबा पाटील पवार, जनु काका पवार, संजय तुळशीदास पवार, बबलू पवार यांच्यासह त्यांचे सहकारी, शाळेचे शिक्षकवृंद व निंभारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








