कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाचे वाढती तीव्रता पाहता अखेर देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला. अखेर आंदोलनापुढे त्यांना नाईलाजाने का होईना राजीनामा द्यावा लागला. मात्र आता प्रधान यांच्यानंतर नितीन गडकरी यांचे नाव राजीनाम्यासाठी चर्चेत येऊ लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मोर्चावेळी व्यासपीठावरुन केलेल्या भाषणातून हेच संकेत दिले.
नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा का होतेय?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांचा उल्लेख जाणीवपूर्वक खड्डामंत्री असा करत त्यांच्या राजीनाम्याबाबत उल्लेख केला. सध्या देशात इथेनॉलवर चर्चा सुरु असून नितीन गडकरींवर यामुळे जोरदार टीका सुरु आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याबाबत छेडलं गेलं.
नितीन गडकरी यांना अनेकांनी टीकेचे लक्ष्य
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन तापण्यापूर्वी देशभरात वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पेट्रोलमधील इथेनॉलच्या भेसळीचा मुद्दा प्रचंड गाजला होता. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढवल्याने वाहने बिघडत असल्याच्या तक्रारी देशभरातून समोर येत होत्या. मात्र, नितीन गडकरी यांनी इथेनॉलविरहीत शुद्ध पेट्रोल विकत घ्यायचे असल्यास जास्त पैसे मोजावे लागतील, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यावरुन नितीन गडकरी यांना अनेकांनी टीकेचे लक्ष्य केले होते.
सोशल मीडियावर त्यांची अनेक मिम्स व्हायरल
सोशल मीडियावर त्यांची अनेक मिम्स व्हायरल झाली होती. याशिवाय, आगामी काळात डिझेलमध्ये आइसोब्यूटेनॉल मिसळण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचीही चर्चा आहे. नितीन गडकरी यांचा मुलगा इथेनॉलनिर्मितीच्या क्षेत्रात असल्याने केंद्र सरकारकडून इंधनात इथेनॉल मिसळण्याला प्रोत्साहन दिले जात आहे, अशी चर्चाही रंगली होती. या सगळ्यामुळे नितीन गडकरींना देखील राजीनामा देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.








