धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
नीट पेपरफुटी मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील परीक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक,सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.याचसंदर्भातील माहिती मोदींनी त्यांच्या या व्हिडीओद्वारे दिलेली आहे. परीक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी एक उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष म्हणजे ही जबाबदारी त्यांनी नंदन नीलेकणी यांच्यावर सोपली आहे.
आता हे नंदन नीलेकणी नेमके कोण आहेत? त्यांनी याआधी नेमकं काय काय केललं आहे? याबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहे.
कोण आहेत नंदन नीलेकणी?
नंदन नीलेकणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. त्यांना ‘आधार’ प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार म्हटले जाते. २ जून १९५५ रोजी बंगळूरु येथे जन्मलेले नंदन मोहनराव नीलेकणी हे भारतातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान नेत्यांपैकी एक आहेत. बंगळूरुमध्ये जन्मलेल्या नीलेकणी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आणि १९७८ मध्ये मुंबईतील पटनी कॉम्प्युटर सिस्टीम्समध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
इन्फोसिसच्या स्थापनेत मोठा हातभार
१९८१ मध्ये, नंदन नीलेकणी यांनी नारायण मूर्ती आणि इतर पाच सहकाऱ्यांसोबत इन्फोसिसची स्थापना केली, जी पुढे भारतातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपन्यांपैकी एक बनली. २००२ मध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापूर्वी नीलेकनी यांनी अनेक नेतृत्व पदे भूषवली होती. CEO म्हणून त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात, इन्फोसिसचा महसूल सहा पटीने वाढून जवळपास ३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. २०१७ मध्ये माजी CEO विशाल सिक्का यांच्या निवृत्तीनंतर, नीलेकनी गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून इन्फोसिसमध्ये परतले.
UIDAI चे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिलं
UIDAI चे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. नंदन नीलेकणी यांनी जगातील सर्वात मोठा बायोमेट्रिक ओळख कार्यक्रम असलेल्या आधारची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यास मदत केली. आज,आधार हा भारताच्या डिजिटल प्रशासन परिसंस्थेचा कणा बनला असून,तो एक अब्जाहून अधिक लोकांना थेट लाभ हस्तांतरण, आर्थिक समावेशन आणि ओळख पडताळणीची सुविधा पुरवतो.
HIGH POWERED TASK FORCE on examination reforms under the leadership of Shri Nandan Nilekani constituted.@NandanNilekani pic.twitter.com/mMpmPdIEL5
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
UPI च्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली
भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यातही निलेकानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अशा आराखड्याला प्रोत्साहन देण्यात मोलाचा वाटा उचलला, ज्यामुळे अखेरीस युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच ज्याला आपण आज ‘UPI’ म्हणतो त्याचा विकास झाला आणि देशभरातील डिजिटल पेमेंटमध्ये नवीन तंत्रज्ञान उदयास आलं.
काँग्रेसच्या तिकिटावर लढवली निवडणूक
2014 सालच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहून तंत्रज्ञान, सार्वजनिक धोरण आणि सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केले. समाजकार्यातही त्यांचे मोठे योगदान असून 2023 साली त्यांनी आयआयटी मुंबईला तब्बल 315 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याआधीही त्यांनी 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती.
निलेकानी त्यांची जबाबदारी कशी पार पाडणार?
नंदन नीलेकणी यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील मोठे डिजिटल प्रकल्प यशस्वीपणे राबवण्याचा अनुभव आहे. तांत्रिक ज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळेच परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी सरकारने नंदन नीलेकणी यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता ते ही जबाबदारी कशी पार पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








