टोळी वादातून मानेवाडा स्मशानघाटात दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. एका स्मशानभूमीत बोलावून एका तरुणाची कथितरित्या हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जातं. या हल्ल्यात त्याचा साथीदार जखमी झाला. स्मशानघाटात घडलेल्या या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
धारदार शस्त्रे व दगडांनी निर्घृण हल्ला केला.
आधी पवन सूर्यवंशी असे मृताचे तर अमन काळे, असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दहा मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काका ऊर्फ अमन चौरसिया (वय २०), अजय चौरसिया, यश सौदे, पीयूष बघेल (चौघेही रा. ज्ञानेश्वरनगर), वेदांत कापटे (रा. महाकालीनगर), नायडू, रौनक राऊत व अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला मानेवाडा स्मशानभूमीत झाला, जिथे आरोपींनी जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने पवनला बोलावले होते. हल्लेखोर आधीच घटनास्थळी थांबले होते आणि त्यांनी धारदार शस्त्रे व दगडांनी निर्घृण हल्ला केला.
वाद मिटविण्याच्या बहाण्याने घाटावर बोलावलं अन्….
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पवन आणि काका यांच्यात वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर पवन, अमन आणि अजय सोलंकी या तिघांनी काकाला गाठून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी अजनी पोलिसांनी पवन व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून काका आणि पवन टोळी एकमेकांचा काटा काढण्याच्या तयारीत होती. काकाने वेदांत व साथीदारांच्या मदतीने पवनच्या हत्येचा कट आखला. वाद मिटविण्याच्या बहाण्याने पवनला मानेवाडा घाटावर बोलाविण्यात आले.
वाद इतका विकोपाला गेला की….
शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पवन, अमन काळे, अजय काळे आणि अजय सोलंकी हे चौघे घाटावर आले.तेथे काका, अजय व त्यांच्या साथीदारांनी चौघांना घेरले. ‘माझ्या भावाला का मारले’, अशी विचारणा अजयने पवनला केली. त्यावरून पुन्हा वाद सुरू झाला.तो वाद इतका विकोपाला गेला की अजयच्या साथीदाराने पवनच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. त्यानंतर इतरांनी चौघांवर शस्त्रांनी हल्ला चढविला. जीव वाचविण्यासाठी चौघेही पळू लागले. मात्र, काका व त्याच्या साथीदारांनी पवनला गाठून त्याच्यावर शस्त्रांनी वार केले. यात पवनचा मृत्यू झाला. अमन काळेही आरोपींच्या तावडीत सापडला. त्याच्यावरही वार करण्यात आले. तो गंभीर जखमी झाला. अजय काळे आणि अजय सोलंकी मात्र आरोपींच्या तावडीतून बचावले.
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल
पवनचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच काका आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हेशाखेचे अपर पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्यासह हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठविला. जखमी अमन काळे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
घटनाक्रमाची तपासणी सुरु
पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेत सहभागी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. अधिकारी हल्ल्यापर्यंतच्या घटनाक्रमाचीही तपासणी करत आहेत, ज्यामध्ये पीडित व्यक्तीला निर्जन ठिकाणी बोलावण्यासाठी सोशल मीडियाच्या कथित वापराचाही समावेश आहे.








