ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळासाहेब महादेव कोठुळे यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक २० जून २०२६ रोजी दिल्ली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात अचिव्हर अवॉर्ड कौन्सिल या संस्थेकडून त्यांच्या सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.
पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील बाळासाहेब कोठुळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात गेली पंधरा वर्षे निर्भीड आणि निष्पक्षपणे काम केले आहे. समाजातील प्रश्न, सामान्य नागरिकांचे विषय आणि जनहिताचे मुद्दे त्यांनी सातत्याने लेखणीच्या माध्यमातून मांडले. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.
दैनिक पुढारी कोल्हापूर, दैनिक पुणे प्रभात, दैनिक गावकरी नाशिक, दैनिक सार्वमत श्रीरामपूर यांसह महाराष्ट्राची भूमी, नगर परिवर्तन अशा साप्ताहिकांमधूनही त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण केले आहे. तसेच दैनिक लोकशक्ती, दैनिक लोक परिवर्तन, दैनिक रोखठोक, दैनिक साहित्य सेवा आणि दैनिक साहित्य तेज अशा विविध ऑनलाईन ई-पेपरमधूनही त्यांचे लिखाण सुरू आहे.
पत्रकारितेसोबतच साहित्य क्षेत्रातही बाळासाहेब कोठुळे यांचे गेल्या तीस वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान आहे. अनेक कवी संमेलने, साहित्य संमेलने आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठांवरूनही त्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालक, संवेदनशील साहित्यिक आणि समाजभान जपणारे पत्रकार अशी त्यांची ओळख आहे.
त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत अचिव्हर अवॉर्ड कौन्सिल या संस्थेकडून त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. या सन्मानाबरोबरच संस्थेचे आमरण सदस्यत्वही त्यांना मिळाले असून, ही बाब त्यांच्या कार्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे.
बाळासाहेब कोठुळे सरांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नेवासा तालुक्यातील निंबारी येथील कवी गोरक्षनाथ पवार, प्रा. मोहिनीराज होन सर, डॉ. बाळासाहेब वाहूरवाघ, अॅड. संजय माकोणे सर, ज्येष्ठ कवी आत्माराम शेवाळे आणि कवी राजेंद्र उदारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या बाळासाहेब कोठुळे सरांचा हा सन्मान त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.








