वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप
मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वेसावा कोळीवाडा सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण कोळी समाज हादरून गेला असून प्रशासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वेसावा कोळीवाड्यातील भूमिपुत्र राजू बाळकृष्ण काळथे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मते, महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या पंप जप्ती मोहिमेमुळे त्यांनी सकाळीच घरातील पंप काढून ठेवला होता. मात्र संध्याकाळी मर्यादित वेळेस येणाऱ्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी पुन्हा पंप जोडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वेसावा कोळीवाड्यातील अनेक घरे शेकडो वर्षे जुनी असून त्यामध्ये जमिनीखाली पाणीसाठवणुकीच्या आधुनिक टाक्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना छतावरील टाक्यांमध्ये पाणी चढवण्यासाठी मोटारींचा वापर करावा लागतो. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई महानगरपालिकेकडून अशा मोटारी जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार, शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात अधिकारी घराघरांत जाऊन वैध जलजोडणी असलेल्या मोटारीदेखील जप्त करत आहेत.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे पाणीपुरवठा नियमित होत नाही, तर दुसरीकडे पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारी जप्त केल्या जात असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, महानगरपालिका नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नसेल तर लोकांनी आपल्या घरात पाणी कसे साठवायचे? पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी नागरिकांना मोटारींचा वापर करावा लागत असेल, तर त्यावर दडपशाहीची कारवाई का केली जात आहे? भूजलावरील पारंपरिक हातपंपांनाही बंदी घालून कारवाई केली जात असताना टँकर व्यवसायाला मात्र मोकळीक का दिली जात आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
मुंबईच्या विकासासाठी आपली जमीन, समुद्रकिनारे आणि पारंपरिक व्यवसाय गमावलेल्या कोळी समाजामध्ये या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आम्ही पाणी मागितले होते, पण त्याची किंमत एका जीवाने का मोजावी लागली?” असा सवाल आता वेसावा कोळीवाड्यातून उपस्थित केला जात आहे.
राजू काळथे यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, वेसावा कोळीवाड्यात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा तसेच पंप जप्ती मोहिमेचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी आले यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
आता हा केवळ अपघात आहे की प्रशासनाच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम, याचे उत्तर शासन आणि प्रशासनाला द्यावे लागणार आहे. कारण एका भूमिपुत्राचा जीव गेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण वेसावा कोळीवाडा न्यायाच्या प्रतीक्षेत उभा आहे.








