साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक, कादंबरीकार किंवा शाहीर नव्हते; ते भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक सांस्कृतिक योद्धे होते. मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी दारिद्र्य, स्थलांतर, उपेक्षा आणि अन्याय जवळून अनुभवला. शिक्षणाची औपचारिक संधी न मिळूनही त्यांनी लोकजीवन, श्रम, संघर्ष आणि माणुसकी यांनाच आपले विद्यापीठ मानले. म्हणूनच त्यांच्या साहित्यात पुस्तकातील कल्पना नव्हत्या, तर रस्त्यावरच्या माणसाचे जगणे होते.
अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा
“ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्ट करणाऱ्या माणसाच्या तळहातावर तरलेली आहे” हा त्यांचा विचार आजही सामाजिक न्यायाचा घोष आहे. “फकिरा” सारख्या कालजयी कादंबरीपासून शेकडो कथा, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्यांपर्यंत त्यांनी साहित्याला परिवर्तनाचे अस्त्र बनवले. त्यांची शाहिरी ही केवळ मनोरंजन नव्हती; ती अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा, आत्मसन्मानाची जाणीव आणि जनतेच्या संघर्षाला दिशा देणारी सांस्कृतिक चळवळ होती.
अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक जडणघडणीवर कम्युनिस्ट चळवळीचा लक्षणीय प्रभाव होता. मुंबईत स्थलांतरानंतर ते कामगार वस्त्यांतील जीवनाशी जोडले गेले आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी तसेच कामगार चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध निर्माण झाला. त्यांनी मार्क्सवादी विचारांतील वर्गसंघर्ष, श्रमाचे मूल्य आणि शोषणमुक्त समाजाची संकल्पना आत्मसात केली; मात्र त्यांचा कम्युनिझम हा केवळ तात्त्विक नव्हता, तर तो उपाशी, वंचित आणि श्रमजीवी माणसाच्या जीवनातून घडलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा आणि डाव्या कामगार चळवळीच्या आर्थिक न्यायाच्या भूमिकेचा संगम त्यांच्या लेखनात दिसून येतो. त्यांच्या कथा, पोवाडे आणि शाहिरीत कामगार, गिरणी कामगार, स्थलांतरित, दलित आणि उपेक्षित समाजाचा आवाज ठळकपणे उमटतो.
मानवी प्रतिष्ठा आणि श्रमाचा सन्मान या मूल्यांना अधिक महत्त्व
अण्णाभाऊ साठे यांचे सोव्हिएत रशियाशीही विशेष नाते होते. त्यांच्या साहित्याचा सन्मान तत्कालीन सोव्हिएत संघात झाला आणि त्यांना तेथे भेट देण्याचे निमंत्रण मिळाले. रशिया दौऱ्यानंतर त्यांनी “माझा रशियाचा प्रवास” हे प्रवासवर्णन लिहिले. तेथे त्यांनी शिक्षण, कामगारांचा सन्मान, सांस्कृतिक चळवळी आणि सामाजिक समानतेचे अनेक पैलू जवळून अनुभवले. तथापि, त्यांनी रशियाचे अंधानुकरण करण्याऐवजी भारतीय वास्तवाच्या संदर्भात सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि श्रमाचा सन्मान या मूल्यांना अधिक महत्त्व दिले. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना त्यांना केवळ कम्युनिस्ट विचारवंत म्हणून नव्हे, तर सामाजिक न्याय, सांस्कृतिक परिवर्तन आणि माणुसकीचे लोकशाहीवादी शिल्पकार म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या विचारांचा अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनावर स्पष्ट प्रभाव दिसून येतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो किंवा कामगारांच्या हक्कांची लढाई अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून जनतेच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यांच्यासाठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ या समाजपरिवर्तनाच्या दोन परस्परपूरक शक्ती होत्या.
इतिहास आजही अनेकांना माहीत नाही
मुंबईतील गोरेगावाशी अण्णाभाऊ साठे यांचे एक भावनिक नाते आहे. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा श्वास त्यांनी गोरेगाव येथे घेतला. हा इतिहास आजही अनेकांना माहीत नाही. त्यामुळे गोरेगाव ही केवळ त्यांची अखेरची कर्मभूमी नसून त्यांच्या विचारांची स्मृती जपणारी भूमी आहे. या इतिहासाचे जतन करणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
आजचा काळ बदलला आहे, परंतु प्रश्न अनेक ठिकाणी तेच आहेत. सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, पर्यावरण, संविधानिक हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समान संधी यांसाठी आजची Gen Y, Gen Z आणि Gen Alpha पिढी नव्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आवाज उठवत आहे. कविता, रॅप, स्ट्रीट प्ले, पोस्टर आर्ट, डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया, लोकगीत, भित्तिचित्रे आणि इतर सांस्कृतिक माध्यमांचा वापर करून ही पिढी आंदोलनांना नवी भाषा देत आहे. हे चित्र पाहताना अण्णाभाऊ साठे यांचा सांस्कृतिक लढा पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटतो.
आज उपवर्गीकरणाचा प्रश्न विशेषतः मातंग समाजासमोर एक महत्त्वाचा विषय म्हणून उभा आहे. या विषयावर प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा लोकशाही अधिकार आहे; परंतु या चर्चेपलीकडे जाऊन समाजाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे केवळ उपवर्गीकरणामुळे आपल्या समाजाचे सर्व प्रश्न सुटणार आहेत का? अण्णाभाऊ साठे यांचा वारसा पुढे नेण्याचा अर्थ फक्त त्यांच्या नावाने राजकीय भूमिका घेणे नाही, तर त्यांनी स्वप्न पाहिलेला सुशिक्षित, स्वाभिमानी, संघटित आणि विवेकनिष्ठ समाज घडवणे हा आहे.
इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे की, वंचित समाजात अंतर्गत फूट निर्माण झाली की त्याचा सर्वाधिक लाभ सत्तेच्या राजकारणाला होतो आणि सर्वाधिक नुकसान समाजाच्या सामूहिक शक्तीचे होते. त्यामुळे आज अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने समाजात नवे भेद निर्माण करण्याऐवजी त्यांच्या विचारांच्या आधारावर समाजात शिक्षण, व्यसनमुक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक ऐक्य आणि राजकीय जागरूकतेची चळवळ उभी करणे अधिक आवश्यक आहे.
आजच्या तरुणांनी अण्णाभाऊ साठे यांच्याकडून या गोष्टी शिकण्याची आवश्यकता
आजच्या तरुणांनी अण्णाभाऊ साठे यांच्याकडून केवळ संघर्षाची प्रेरणा घेऊ नये, तर विचार मांडण्याची लोकाभिमुख पद्धतही शिकावी. समाज बदलण्यासाठी केवळ घोषणा पुरेशा नसतात; साहित्य, कला, शाहिरी, लोकनाट्य, संगीत आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती हीसुद्धा परिवर्तनाची प्रभावी साधने असतात. लोकशाही आंदोलनांची खरी ताकद केवळ गर्दीत नसून विचार, संवाद, संवेदनशीलता आणि लोकजागृतीत असते हे अण्णाभाऊंनी आपल्या आयुष्याने दाखवून दिले.
अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या पुस्तकांचे वाचन
अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या पुस्तकांचे वाचन, त्यांच्या विचारांचा अभ्यास आणि सामाजिक न्यायासाठी संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची परंपरा पुढे नेणे. कारण लोकशाही तेव्हाच बळकट होते, जेव्हा साहित्य जिवंत राहते, सांस्कृतिक चळवळी जागृत राहतात आणि तरुण पिढी प्रश्न विचारण्याचे धाडस जपते.
अण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली ही घोषणांमधून नव्हे, तर समाजाच्या अंतर्गत परिवर्तनातूनच वाहिली जाऊ शकते
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
✍🏻 ॲड. दिपक सोनावणे
सामाजिक कार्यकर्ता










