मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा Mumbai Metro Aqua Line 3
मुंबई : मुंबई मेट्रो अॅक्वा लाईन 3 मधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भुयारी मेट्रोमधील नेटवर्क समस्येमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून वोडाफोन आयडिया (Vi) कंपनीने आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर आपली मोबाइल नेटवर्क सेवा सुरू केली आहे.
मुंबई मेट्रो लाईन 3 च्या जवळपास 50 मिनिटांच्या भुयारी प्रवासादरम्यान मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कार्यालयीन कामे, ऑनलाइन व्यवहार, व्हिडिओ कॉल, ई-मेल्स तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे कठीण होत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती.
गेल्या आठवड्यात Vi कंपनीने आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक या 16 स्थानकांवर मोबाइल सेवा सुरू केल्याची घोषणा केली होती. आता ही सेवा वाढवून संपूर्ण मार्गिकेवर म्हणजेच कफ परेडपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मात्र ही सेवा सुरू होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) आणि एसीईएस इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील काही तांत्रिक आणि आर्थिक वादांमुळे नेटवर्क सेवा काही काळ रखडली होती. भूमिगत स्थानके आणि बोगद्यांमध्ये नेटवर्क पोहोचवण्यासाठी एमएमआरसीने एसीईएस इंडिया या कंपनीला कंत्राट दिले होते. या कंपनीचे काम सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी इन-बिल्डिंग सोल्यूशन (IBS) नेटवर्क उभारणे होते.
मात्र नेटवर्क उभारणीनंतर एसीईएसने टेलिकॉम कंपन्यांकडे जागेचे भाडे आणि ‘राइट ऑफ वे’साठी जास्त शुल्काची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांनी सेवा सुरू करण्यास नकार दिला आणि संपूर्ण प्रकल्प रखडला.
आता Vi नेटवर्क सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवासादरम्यान अखंड इंटरनेट, कॉलिंग आणि डिजिटल सेवा उपलब्ध होणार असल्याने वेळेची बचत होणार असून आपत्कालीन परिस्थितीतही संपर्क साधणे सोपे होणार आहे.










