इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ एका प्रवासी जहाजाला आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इंडोनेशियाच्या बचाव संस्थेनुसार आग लागली तेव्हा जहाजावर २७१ प्रवासी आणि कर्मचारी होते. रविवार दुपारपर्यंत किमान २२५ जणांना वाचवण्यात यश आलं आलं आहे. अद्याप बेपत्ता असलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बचाव कार्यासाठी अनेक जहाजे तैनात
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व जावा प्रांतातील सुराबाया येथून दक्षिण सुलावेसीमधील मकासारकडे जात असताना, जावाच्या ईशान्य किनाऱ्याजवळील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग लागली. बचाव कार्यासाठी अनेक जहाजे तैनात करण्यात आली आहेत. अधिकारी आजूबाजूच्या पाण्याच्या क्षेत्रात शोधमोहीम सुरु आहे.
अशीच एक घटना वर्षभरापूर्वी घडली होती
दरम्यान जहाजाला आगीचं कारण सध्या स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान अशीच एक घटना, एका वर्षापूर्वी इंडोनेशियामध्ये घडली होती. जुलै २०२५ मध्ये, उत्तर सुलावेसी प्रांताजवळ एका प्रवासी जहाजाला आग लागली होती, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला. सुमारे १५० लोकांना वाचवण्यात यश आलं होतं. केएम बार्सिलोना ५ नावाच्या या जहाजावर २८० लोक प्रवास करत होते. ही घटना १९ जुलै रोजी राजधानी मनाडो जवळ घडली होती.
इंडोनेशियामध्ये असे अपघात सर्रास घडतात
यापूर्वी २०२१ मध्ये, टर्नेटहून निघाल्यानंतर थोड्याच वेळात केएम कार्या इंदाह या जहाजाला मोलुक्का समुद्रात आग लागली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना पाण्यात उडी मारण्यास भाग पडले. अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक मच्छीमार बोटींनी २२ मुलांसह १८१ प्रवासी आणि १४ कर्मचाऱ्यांची सुटका केली. १७,००० हून अधिक बेटांचा समावेश असलेल्या जगातील सर्वात मोठ्या द्वीपसमूह राष्ट्र, इंडोनेशियामध्ये असे अपघात वारंवार घडत असल्याचं समोर आलं आहे.










