राज्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती.त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातही शेतीच्या कामांसाठी सगळेचजण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते.त्यानंतर अखेर शुक्रवार १७ जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे. आज शनिवारी देखील (१८ जुलै २०२६) अनेकांना पावसाने दिलासा दिला आहे. राज्यातील इतर शहरांप्रमाणेच मुंबई, ठाणे, बीड, सोलापूर, अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाने हजेरी लावली.विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरीला लावल्याने राज्यासहित मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने आज अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, मुंबई-कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला गती मिळाली आहे. मात्र, मोठ्या पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल असं म्हटलं जात आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस अजून पोहोचला नसला तरी आज बहुतांश भागात मुसळधार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जोरदार वारा, विजांसह वादळी पावसाची शक्यता
मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. दरम्यान मुंबई-कोकण वगळता आज उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी आज जोरदार वारा, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सावध राहण्याची सूचनाही जारी करण्यात आली आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
मुंबई वेधशाळेने राज्यातील विविध भागात पावसाचा इशारा दिला होता. वेधशाळेने 17 जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ , वर्धा, नागपूर, भंडारा , गोंदिया, चंद्रपूर , गडचिरोली भागात पावसाची शक्यता वर्तवली होती. या भागात वेधशाळेने यलो अलर्ट दिला.
मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात
वेधशाळेच्या अंदाजानंतर मुंबई, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे.अनेक शेतकऱ्यांची पावसाअभावी भाताची पुनर्लागवड करण्याची कामे खोळंबली होती. पावसाने विश्रांती घेतल्याने काही ठिकाणी पुनर्लागवड करण्यात आलेला भात करपून जाण्यासही सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
तळकोकणात मुसळधार पावसाची हजेरी
तत्पूर्वी, तळकोकणातही सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडीत शिरशिंगे गावातील धोंडवाडीतील तेरेखोल नदीला पूर आल्याची माहिती हाती आली आहे. या पुरामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे.कोकणातील काही शहरी भागात सखल पाणी साचल्याचंही दिसून आलं. एकंदरीतच दडून बसलेल्या मान्सूनने चांगलंच महाराष्ट्रात चांगलंच कमबॅक केल्याचं पाहायला मिळत आहे.








