पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवालची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी १८ जून रोजी हत्या केल्याचा आरोप आहे. आज म्हणजे १८ जुलै २०२६ रोजी केतनच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. अशात केतन अग्रवालचे संपूर्ण कुटुंब पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला साकड घालण्यासाठी आलेलं. यावेळी केतनच्या बहिणीने प्रसारमाध्यमांशी संवादही साधला.
‘आज माझ्या भावाला एक महिना पूर्ण झाला…’
केतन अग्रवाल याची बहीण म्हणाली, “आज माझ्या भावाला एक महिना पूर्ण झाला आहे. एक महिना झाला, मी त्याला पाहिलं नाही. त्याचा आवाज ऐकला नाही आणि त्याचं हसू मला ऐकायला आलं नाही.. माझी फक्त गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना आहे की, माझ्या भावाला लवकरत लवकर न्याय मिळायला हवा आणि तो आता जिथे कुठे आहे, तिथे शांतीने जगू शकेल. त्याने आनंदी राहवं एवढीच इच्छा आहे.”
सर्व गोष्टींचा खुलासा ट्रायलमध्ये होईल
तसेच ती पुढे म्हणाली, “आज माझ्या आजोबांचा वाढदिवस आहे आणि भावाच्या मृत्यूला देखील एक महिना झाला आहे. हे दुःख आमच्या कुटुंबासाठी फार मोठं आहे” एवढंच नाही तर, सियावर संशय कसा आला? असा प्रश्न देखील माध्यमांकडून तिला विचारण्यात आला. यावर केतनच्या बहीणीने प्रतिक्रिया देत म्हटलं की,”या सर्व गोष्टींचा खुलासा ट्रायलमध्ये होईल, आता आम्ही गणराया चरणी फक्त एवढीच प्रार्थना करत आहोत की, केतन याला न्याय लवकरात लवकर मिळायला हवा.” दरम्यान पोलीस देखील याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात कोर्टात चालवलं जात आहे. तर सियाच्या पालकांकडून सतत वकील बदलले जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान केतनचे वडील विशाल अग्रवाल म्हणाले, ‘जे माझ्या मुलासोबत झालं आहे, असं कोणाच्याच मुलासोबत नाही झालं पाहिजे… न्यायव्यवस्थेकडे माझी एकच मागणी आहे आणि ती म्हणजे, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी. ही शिक्षा लवकरात लवकर मिळावी. मी पंतप्रधानांना पत्र लिहून एवढीच मागणी केली आहे की, लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.’
त्यामुळे आता केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुढे आणखी काय खुलासे होणार, कोणती रहस्ये समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.









