निसर्ग प्रेमी बहुउद्देशी संस्था महाराष्ट्र राज्य जिल्हा पालघर मधील विक्रमगड तालुक्यामधील एकूण नऊ विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय वस्तू , खेळाचे साहित्य आणि खाऊ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.दिनांक १७ जुलै २०२६ रोजी शुक्रवार रोजी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या उपक्रमाचा लाभ परिसरातील एकूण ३२३ गरजू विद्यार्थ्यांना मिळाला.
आदर्श विद्यार्थ्यांचा गौरव अन् पद्मश्री भिकल्या धिंडा बाबांची भेट
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा साखरे-गावठाण, साखरे-पाटील पाडा आणि साखरे डोंगरी पाडा या शाळांना भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच प्रत्येक शाळेतील एका ‘आदर्श विद्यार्थ्याला’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या प्रवासादरम्यान आदिवासी लोककलेचे जतन करणारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदरणीय भिकल्या धिंडा बाबा यांची अविस्मरणीय भेट झाली. संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
आषाढी एकादशीचे औचित्य अन् कार्यक्रमस्थळी गोल रिंगण
तसेच कार्यक्रम संपल्यावर आगामी आषाढी एकादशीचे औचित्य साधून सर्व विद्यार्थी व संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत वारकरी रूपात गोल रिंगण तयार करून सुंदर असे विठ्ठलाचे गाणे गाऊन नृत्य सादरीकरण केले. ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
९ शाळांमध्ये साहित्याचे वाटप
यानंतर पुढील सत्रांमध्ये जिल्हा परिषद शाळा तीवस पाडा, खुडेद-घोडीचा पाडा, खुडेद-म्हसेपाडा, खुडेद-महाल पाडा तसेच चौथ्या सत्रात जिल्हा परिषद शाळा खुडेद-कुंडाचा पाडा आणि खुडेद-झाप पाडा येथे भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. विक्रमगड येथील संतोष पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळी विद्यार्थ्यांना विशेष खाऊ वाटपही करण्यात आला.
सहकार्य करणाऱ्यांचे आभार
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई, पालघर, वसई आणि डहाणू येथील संस्थेचे सर्व कमिटी सदस्य, पदाधिकारी, संघटक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात पाऊस जास्त असल्याने विक्रमगड येथील रहिवासी ईश्वर बाळू पवार व भीमा ईश्वर पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्नेहभोजनासाठी आपले घर उपलब्ध करून दिले. तसेच अर्जुन सुरुम सर, मोहन शिरकर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य केले.या सर्वांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या उपक्रमाला ‘समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘पोलिस मित्र सक्षमीकरण संस्था’ यांचेही मोलाचे सहकार्य लाभलं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक विश्वप्रार्थना, घोषणा आणि पसायदानाने या कौतुकास्पद उपक्रमाची सांगता करण्यात आली.








