सध्या संपूर्ण देशभर चर्चेत असलेला विषय म्हणजे दिल्लीत जंतरमंतर मैदानात सुरु असलेलं सोनम वांगचुक यांचं उपोषण. सोनम यांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारांमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देऊन संविधानाच्या सहाव्या अनुसूचीचा समावेश करणे अशा अनेक मुद्द्यांसाठी आंदोलन सुरु केलं आहे.मात्र आज त्यांची तब्येत खालावल्यामुळे वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर मात्र आंदोलनस्थळी सर्वांचाच आक्रोश पाहायला मिळाला.
सोनम वांगचुक यांच्या या उपोषणाबद्दल आज प्रत्येकजण आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. यातच सामाजिक कार्यकर्ते ॲड.दिपक सोनावणे यांनी देखील याबद्दल लेख लिहून आपलं मत व्यक्त केलं आहे. नक्की त्यांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊयात या लेखामधून.
ॲड.दिपक सोनावणे म्हणाले,
“सोनम वांगचुक यांच्या प्रत्येक भूमिकेशी मी सहमत असेनच असं नाही. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे. कारण ते सत्तेसमोर प्रश्न विचारण्याचं धाडस करतात.
अभिजीत दिपके यांच्या राजकीय भूमिकेबद्दल माझ्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत, मतभेद आहेत. पण आज ते ज्या मुद्द्यांसाठी लढत आहेत, तो लढा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आज व्यक्ती कोण आहे, पक्ष कोणता आहे, विचारसरणी काय आहे, यापेक्षा ते कोणत्या प्रश्नासाठी उभे आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे.
गेले अनेक दिवस सोनम वांगचुक उपोषण करत आहेत. त्यांनी हिंसेचा मार्ग निवडला नाही. दगडफेक केली नाही. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं नाही. त्यांनी गांधीजींचा मार्ग निवडला उपोषणाचा. पण आज सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. हे पाहून मनात एकच प्रश्न निर्माण झाला शांततेने आंदोलन करणाऱ्यालाही जर दडपलं जात असेल, तर लोकशाही नेमकी कुठे उरली आहे?”
ॲड.दिपक सोनावणे यांनी या मुद्द्यांवरून काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
“आज सोनम आहेत… उद्या कोण ?
शेतकरी ? विद्यार्थी ? पत्रकार ? बेरोजगार तरुण ? की आपण ?
लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही. लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचा अधिकार. लोकशाही म्हणजे सरकारचं कौतुक करण्याचाही अधिकार आणि गरज पडली तर सरकारला जाब विचारण्याचाही अधिकार. जर शांततेने आंदोलन करणाऱ्यालाच गुन्हेगारासारखी वागणूक मिळत असेल, तर ही परिस्थिती कोणत्याही लोकशाहीसाठी धोक्याची आहे.”
“मला आज एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे लोकशाही आता व्हेंटिलेटरवर आहे.पण यासाठी फक्त एका सरकारला किंवा एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही. ही समस्या खूप खोल आहे. ही एका व्यक्तीची चूक नाही, तर व्यवस्थेची चूक आहे. वर्षानुवर्षे अशी व्यवस्था तयार झाली आहे की, सत्तेत कोणताही पक्ष आला तरी प्रश्न विचारणाऱ्यांकडे संशयाने पाहिलं जातं. हे बदललं पाहिजे.”
राजीनामा हा शेवट नसतो पण…
“हो, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाला म्हणून सगळे प्रश्न एका दिवसात सुटणार नाहीत. पण राजीनामा हा शेवट नसतो; तो जबाबदारी निश्चित करण्याची सुरुवात असतो. जेव्हा सत्तेत बसलेल्या व्यक्तींना त्यांच्या निर्णयांची जबाबदारी घ्यावी लागते, तेव्हाच व्यवस्था बदलायला सुरुवात होते.
आज महाराष्ट्रातील अनेक तरुण दिल्लीत उभे आहेत. ते कोणत्याही एका नेत्यासाठी लढत नाहीत. ते लोकशाहीसाठी, संविधानासाठी आणि सामान्य माणसाच्या आवाजासाठी उभे आहेत. कारण त्यांना माहिती आहे की, आज जर एखाद्याचा आवाज दाबला गेला, तर उद्या आपलाही आवाज दाबला जाऊ शकतो.
लोकशाही एका दिवसात मरत नाही. ती हळूहळू कमकुवत होत जाते. आधी प्रश्न विचारणारे गप्प होतात. मग आंदोलन करणारे कमी होतात. मग भीती वाढते. आणि शेवटी लोकशाही फक्त संविधानाच्या पुस्तकात उरते.”
प्रश्न भारताच्या लोकशाहीचा
“आज वेळ कोणत्या पक्षाच्या बाजूने उभं राहायचं, याची नाही.
आज वेळ लोकशाहीच्या बाजूने उभं राहायची आहे.
कारण आजचा प्रश्न फक्त सोनम वांगचुक यांचा नाही. अभिजीत दिपके यांचाही नाही.
आजचा प्रश्न भारताच्या लोकशाहीचा आहे.”
“आज सोनम आहेत… उद्या कदाचित आपण असू. म्हणून आज आवाज उठवणाऱ्यांच्या मतांशी पूर्ण सहमत असणं गरजेचं नाही; पण त्यांना आवाज उठवण्याचा अधिकार आहे, याच्या बाजूने ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे.कारण लोकशाही जिवंत असेल, तरच मतभेद जिवंत राहतील. आणि मतभेद जिवंत असतील, तरच भारत जिवंत राहील.”
(ॲड.दिपक सोनावणे)
दरम्यान ॲड.दिपक सोनावणे यांनी या लेखातून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल, सरकारबद्दल, सध्याच्या भ्रष्टाचाराबद्दल तसेच वांगचुक अन् उपोषणासाठी समोर येणाऱ्या तरुणांबद्दल त्यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.








