कोरबा जिल्ह्यातील कटघोरा नगरपालिकेच्या अटल कॉम्प्लेक्समधील माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींचा आरोप आहे की, कांस्य पुतळा बसवण्याऐवजी सिमेंटचा पुतळा बसवून त्याला कांस्य रंग देण्यात आला आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील पावसानंतर पुतळ्याचा रंग अनेक ठिकाणी उडू लागला. यामुळे हा पुतळा कांस्याचा बनलेला नाही हे उघड झाल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे. जर हा पुतळा खरोखरच धातूचा बनलेला असता, तर त्याचा रंग अशा प्रकारे निघाला नसता. यामुळे लोकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
पाणी पडल्यावर मूर्तीचा रंग उडाला
नियमांनुसार आणि निविदा तरतुदींनुसार, येथे शुद्ध कांस्याची मूर्ती स्थापित केली जाणार होती, जेणेकरून हवामानाच्या परिणामांपासून तिचे वर्षानुवर्षे संरक्षण होईल. तथापि, पहिल्याच पावसात निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याच्या वापरामुळे झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. पाणी पडल्यावर मूर्तीचा रंग उडाला आणि त्याखालील सिमेंट पाझरू लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पाहून स्थानिक पातळीवर संताप उसळला आणि हे प्रकरण झपाट्याने चिघळलं.
युवक काँग्रेसने आंदोलन
तसेच कांस्य पुतळ्याऐवजी सिमेंटचा पुतळा बसवल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन सुरू केले असून मुख्यमंत्री कार्यालय हटवण्याच्या मागणीसाठी अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. छत्तीसगड सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं पाहून, युवक काँग्रेसने आता निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुतळा बांधणीसाठी ३० लाखांचा खर्च झाल्याचं माहिती
अटल बिहारी वाजपेयी यांची स्मृती जतन करण्यासाठी राज्य सरकारने सर्व शहरी संस्थांमध्ये अटल संकुल उभारण्याची योजना सुरू केली. या उद्देशासाठी, स्थापित मानकांनुसार संकुले बांधण्यासाठी आणि कांस्य पुतळा बसवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांना स्वतंत्र निधीचे वाटप करण्यात आले. तसेच कटघोरा येथे बांधलेल्या या पुतळ्यासाठी ३० लाखांचा खर्च झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून याबाबत सरकारने उत्तर द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप
या प्रकरणी महानगरपालिकेच्या मुख्य पालिका अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी संपूर्ण बांधकाम, पुतळ्याची गुणवत्ता आणि त्यावर खर्च झालेल्या रकमेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, जर सरकारी निधीचा गैरवापर झाला असेल, तर जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.अशी मागणी करण्यात येत आहे.










