भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार,उद्या म्हणजेच ३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा अंदाज ३ ऑगस्ट सकाळी ८:३० ते ४ ऑगस्ट सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४ तासांसाठी लागू असेल.
कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विखुरलेल्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागासाठी पावसाची संभाव्यता नोंदवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचण्याचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
कोकण किनारपट्टीप्रमाणे पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसराला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील.मात्र, पुणे घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.विशेषतः सातारा घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने पर्यटक व स्थानिकांनी काळजी घ्यावी.तसेच कोल्हापुरात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहतील. घाटमार्गांवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने वाहनचालकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्येही पावसाचा इशारा
नाशिक शहर आणि जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस तर घाट भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होऊ शकते. तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मध्यम पाऊस अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यात तुलनेने हलक्या पावसाचा अंदाज आहे.
प्रशासनाचे आवाहन आणि खबरदारीच्या सूचना
राज्यभरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आणि काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. घाटमार्गाने प्रवास करताना रस्त्यांची स्थिती तपासूनच प्रवास सुरू करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे व स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.








