कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील विद्यार्थिनींनी छत्रीचा माईक करून जी रस्त्याची दुरवस्था समोर आणली होती.त्यानंतर काही तासातच हा रस्ता दुरुस्त झाला. त्यानंतर अनेक गावातून अनेक शाळकरी मुलांनी पुढे येऊन अगदी त्याचप्रमाणे गावातील रस्त्यांची व्यथा मांडली.त्यामुळे कर्जतच्या त्या विद्यार्थिनींचं सर्वांनीच कौतुक केलं. यात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही मागे नाही.त्यांनी देखील या मुलींचं भरभरून कौतुक केलं आहे.
आदित्य ठाकरेंकडून विद्यार्थिनींच्या धाडसाचं कौतुक अन् सायकल गिफ्ट
कोंदिवडे गावात हातातील छत्रीचा माईक बनवत खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याचं केलेलं हे अनोखं रिपोर्टिंग सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर चांगलंच व्हायरल झालं. त्यांच्या या धाडसाची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या विद्यार्थिनींशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. एवढंच नाही तर त्या मुलींना आदित्य ठाकरे यांच्याकडून सायकलही भेट देण्यात आली.
आदित्य ठाकरेंचा या विद्यार्थिनींशी फोनवरून संवाद
आता रस्ता दुरुस्त झाल्यानंतर या चिमुकल्या रिपोर्टर्सनं याच रस्त्यावर दुतर्फा वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी या तीनही विद्यार्थिनींची भेट घेतली. खांडपे येथील मानसी पवार यांच्या घरी तिन्ही विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांशी युवासेना पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी फोनवरून या मुलींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच एवढ्या कमी वयात धाडसानं नागरिकांचे प्रश्न मांडल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनींचं कौतुक केलं.
रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर विद्यार्थिनींचे पर्यावरण संवर्धनासाठी पुढचं पाऊल
बरं, फक्त रस्त्याची समस्या मांडून या मुली थांबल्या नाहीत. तर, रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कोंदिवडे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थिनींनी केली आहे. यासाठी कृषी विभाग आणि वन विभागानं आवश्यक रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं लावल्यास कोंदिवडे परिसर अधिक हिरवागार होईल आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल, अशी भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे.








