गावातील विकासकामे, ग्रामपंचायतीचा कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्न विचारणे हा प्रत्येक ग्रामस्थाचा अधिकार आहे. मात्र, माहिती मागणाऱ्या नागरिकांना योग्य उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देणे किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करणे, असा प्रकार नांदेड जिल्ह्यातील बाचेगाव येथे समोर आला आहे. बाचेगावातील योगेश गुरुलवाड या तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर आणि आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पथदिव्यांचा वाद
योगेशने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामसेवकांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले होते की, येत्या दिवाळीपूर्वी गावातील सर्व खांबांवर पथदिवे बसवले जातील. मात्र, तब्बल ७ महिने उलटून ऑगस्ट २०२६ उजाडला, तरीही गावातील अनेक खांबांवर अजूनही पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. अंधारात राहणाऱ्या ग्रामस्थांना रोजच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
View this post on Instagram
ग्रामसेवकाची मुजोरी
पथदिवे न बसवल्यामुळे आणि या कामात नेमका काय गोंधळ आहे हे जाणून घेण्यासाठी योगेशने माहिती अधिकारांतर्गत अर्जाद्वारे माहिती मागवली. मात्र, ग्रामसेवकांकडून ही माहिती देण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात होती. योगेशने जेव्हा फोनवरून ग्रामसेवकाकडे RTI ची माहिती कधी मिळणार याबाबत विचारणा केली, तेव्हा “RTI देणार नाही, काय करायचं ते करून घे!” असे अत्यंत उद्धट आणि अरेरावीचे उत्तर ग्रामसेवकाने दिल्याचे योगेशने सांगितले.
तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार समोर
ग्रामसेवकाच्या या वागणुकीनंतर योगेशने हार न मानता ऑनलाईन पोर्टलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार नोंदवली. तक्रार ग्रामसेवकापर्यंत पोहोचताच दुसऱ्याच दिवशी योगेशला माहिती घेऊन जाण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र, तिथे गेल्यावर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. योगेशने पथदिव्यांच्या कामासंबंधी आणि त्यावरील खर्चासंबंधी नेमकी माहिती मागितली होती. ती अपेक्षित माहिती देण्याऐवजी ग्रामसेवकाने चक्क ग्रामपंचायतीच्या कॅशबुकच्या २० ते ३० पानांच्या झेरॉक्स प्रती त्याच्या हातात टेकवल्या.
View this post on Instagram
आर्थिक व्यवहारात अनियमिततेची शंका अन् चौकशीची मागणी
या प्रकारानंतर योगेशने प्रशासनाला थेट सवाल केला आहे की, “मागितलेली मूळ माहिती न देता कॅशबुकच्या प्रती देण्यामागचा उद्देश काय? ग्रामसेवक नेमकी कोणती माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत?” अशा अनेक शंका त्याने उपस्थित केल्यात.
यावरून बाचेगाव ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाला आहे का, अशी तीव्र संशयही व्यक्त केला जात आहे. योगेशने या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
१५ ऑगस्ट २०२६ चे नवे आश्वासन पूर्ण होणार का?
दरम्यान, ग्रामसेवकाने येत्या १५ ऑगस्टपर्यंत गावात पथदिवे बसवून दिले जातील, असे नवे आश्वासन देण्यात आल्याचंही योगेशनं सांगितलं. परंतु, मागील अनुभवावरून ग्रामस्थ या आश्वासनावर किती विश्वास ठेवायचा, याच संभ्रमात आहेत. आता १५ ऑगस्टला बाचेगावातील अंधार दूर होऊन पथदिव्यांचा प्रश्न खरोखर मार्गी लागतो की हे आश्वासनही कागदावरच राहते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.








