जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वैष्णोदेवी आणि अमरनाथ या दोन्ही यात्रांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. हवामान अनुकूल होईपर्यंत यात्रेकरुंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसापांसून राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस मुसळधार पावसांचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे हा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरत आहे.
वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हवामानाचा परिणाम
वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे यात्रेकरुंना काही दिवसांसाठी प्रवास थांबवण्याचा सल्ला देण्यात आला. श्री माता वैष्णो देवी श्राझन बोर्डानेही अधिकृतपणे यात्रा थांबवण्यात आल्याची माहिती दिली आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरही पुढील निर्णय घेतला जाईल, असे बोर्डानं स्पष्ट केले आहे.
अमरनाथ यात्रेलाही या निर्णयाचा फटका
अमरनाथ यात्रेलाही या निर्णयाचा फटका बसला आहे.पहलगाम आणि बाल्टाल या दोन्ही प्रमुख मार्गांवरून जाणारी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. बेस कॅम्पच्या पुढे कोणत्याही यात्रेकरूला जाण्याची परवानगी सध्या दिली जात नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
डोंगराळ भागात धोका वाढला आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांची स्थिती बिघडली असून, डोंगराळ भागात धोका वाढला आहे. त्यामुळे हवामान सुधारल्याशिवाय यात्रा पुन्हा सुरू करणे योग्य ठरणार नाही. मार्गांची तपासणी, हवामानाचा अंदाज आणि सुरक्षा यंत्रणांचा अहवाल यांचा विचार करूनच पुढील निर्णय जाहीर केला जाणार आहे.
भाविकांना संयम बाळगण्याच्या सुचना
यंदाच्या अमरनाथ यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत सुमारे 3.76 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाविकांनी संयम बाळगणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच भाविकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये,असे प्रशासनाने सांगितले आहे. यात्रेबाबतचे सर्व अपडेट्स केवळ अधिकृत माध्यमांद्वारे पाहावेत. असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानतील बदल लक्षात घेऊन प्रशासन सतत परिस्थितीचा आढावा घेत आहे.
यात्रा काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय
दरवर्षी लाखो भाविक या दोन्ही धार्मिक यात्रांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये येतात. मात्र, डोंगराळ प्रदेशातील हवामान क्षणाक्षणाला बदलत असल्याने अशा परिस्थितीत सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे यात्रा काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला गेला असला तरी तो केवळ भाविकांच्या हितासाठीच असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
यात्रा पुन्हा कधी सुरु होणार?
सध्या सर्व यंत्रणा हवामानावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पाऊस कमी झाला, रस्ते सुरक्षित झाले आणि प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. तोपर्यंत भाविकांनी कोणतीही घाई न करता प्रशासनाच्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी आणि केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे.








