दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीच्या यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद फक्त दिल्लीतच नाही तर महाराष्ट्रातही पडताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीयमंडळींपर्यंत सर्वांचाच पाठिंबा मिळात आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेला लाठीमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्त होणारा रोष पाहता आता ठाकरे बंधूंनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
ठाकरे बंधूंचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा
आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे थेट रस्त्यावर उतरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले असून २६ जुलै रोजी मुंबईत भव्य संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांना दिलेल्या अयोग्य वागणुकीविरोधात आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संयुक्त मोर्चाची रणनीती आणि आराखडा स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे विशेष पत्रकार परिषद घेणार आहे.
२६ जुलै रोजी मुंबईत भव्य संयुक्त मोर्चा
दरम्यान याआधी मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. आता थेट देशातील तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याने २६ जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या या भव्य संयुक्त मोर्चाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरे आक्रमक
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आक्रमक होण्याचे आवाहन केले आहे. “तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. दिल्ली पोलिसांच्या लाठीमारावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई पोलिसांमध्ये अजूनही संवेदनशीलपणा शिल्लक आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांसारखा विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला नाही.”
एवढंच नाही तर आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आणि नागरिकांना २४ जुलै रोजी चार वाजता शिवाजी पार्क येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नाही, तर केवळ भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत गाऊया आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देऊया,” असे आवाहन त्यांनी केले.
🚨 वन नेशन, वन इमोशन! 🚨
२४ जुलै, शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आमच्यासोबत सामील व्हा! दुपारी ४ वाजल्यापासून आपण सर्वजण तिरंग्याखाली एकत्र येऊया आणि सायंकाळी ५ वाजता आपले राष्ट्रगीत गाऊया.
दिल्लीतील अमानुष दडपशाही आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या अटकेच्या…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2026
अण्णा हजारेंचीही साथ
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे आज गुरुवारी (२३ जुलै २०२६) ‘मौन आंदोलन’ करणार असून त्यांनी केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधण्याची मागणी केली आहे.अण्णा हजारे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनानुसार, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी स्मारकासमोर ते मौन आंदोलनाला बसणार आहेत.








