अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा करण्यात आला होता मात्र अवघ्या १८ ते २० दिवसांतच या दाव्याची धूळधाण उडाली आहे. उद्घाटनानंतर तब्बल ८४ ठिकाणी रस्ता खचल्याने या हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशमध्ये. बहुचर्चित लखनऊ-कानपुर एक्सप्रेसवेचे उद्घाटन करताना उत्तर प्रदेशातील नॅशनल हायवे अमेरिकेसारखे होतील असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला गेला होता. मात्र, भाजप खासदारांच्या भावाने बांधलेल्या या रस्त्याची अवघ्या १८ ते २० दिवसांतच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर दुरुस्त केलेला हा डांबरी रस्ता सुकवण्यासाठी चक्क पंख्यांचा वापर केला जात असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापलेलं दिसत आहे.
अखिलेश यादवांचा टोला: “ही भाजपच्या प्रगतीची नवी हवा!”
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर हा व्हिडिओ शेअर करत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “ही भाजपच्या प्रगतीची नवी हवा आहे! ज्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले, तो वाळवण्यासाठी पंखे लावावे लागत आहेत, ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे.”, असा टोला यादव यांनी लगावला आहे.
६३ किमीचा रस्ता अन् ४,७०० कोटींचा खर्च; परिस्थिती नेमकी काय?
६३ किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेसाठी ₹४,७०० कोटी खर्च झाले आहेत. म्हणजे १ किमी रस्त्यासाठी तब्बल ७५ कोटी खर्च करण्यात आले आहेत. अवघ्या १८ दिवसांत कानपूर लेनवर ३९ ठिकाणी तर लखनऊ लेनवर ४५ ठिकाणी रस्ता खचल्यामुळे दुरुस्ती करावी लागली आहे. ३० जुलै रोजी एक मालवाहू ट्रक या रस्त्यावर खचला होता.यानंतर NHAI ने १००० स्क्वेअर फूट रस्ता उखडून २ फूट खड्डा भरून पुन्हा तयार केला, पण अवघ्या १२ तासांत तिथेही पुन्हा १ ते २ इंचाच्या भेगा पडल्या आहेत.
ये है भाजपाई तरक़्क़ी की नई हवा… कुछ दिनों पहले ही जिसका उद्घाटन हुआ हो उस सड़क को मरम्मत की ज़रूरत पड़ गई और एक्सप्रेस स्पीड से मरम्मत को सुखाने के लिए पंखे का इस्तेमाल किया जा रहा है ये भी हास्यास्पद है। 2-3 हफ़्ते में ही जिस एक्सप्रेसवे का दम उखड़ने लगा है उस पर चलने का जोखिम… pic.twitter.com/zfoydUzRAL
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 6, 2026
भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट
एका बाजूच्या प्रवासासाठी २७५ रुपये टोलही घेण्यात येत होता. मात्र, रस्ता खराब झाल्याने आणि डायव्हर्शनमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने NHAI ने काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली पूर्णपणे बंद केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कडक पावले उचलली आहेत. एक्सप्रेसवे बनवणाऱ्या ‘PNC इन्फ्राटेक लिमिटेड’ या कंपनीला ‘नॉन-परफॉर्मर’ घोषित करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे शिफारस करण्यात आली आहे. ही कंपनी भाजप राज्यसभा खासदार नवीन जैन यांचे भाऊ प्रदीप जैन यांची आहे. या नात्यातूनच हे कंत्राट कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीसह दोन उपकंपन्यांवर दोन वर्षांपूर्वीच बंदी आणण्यात आली होती, नंतर ती उठविण्यातही आली. रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्याचा ३ कोटींचा संपूर्ण खर्च कंत्राटदार कंपनीकडूनच वसूल केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
रस्ता का खचला?
NHAI च्या प्राथमिक अंदाजानुसार, मुसळधार पावसामुळे रस्त्याखालच्या मातीच्या थरांमध्ये पाणी साचलं आहे. ज्यामुळे मातीची पकड सैल झाली अन् रस्ता खचण्याची समस्या निर्माण झाली. मात्र, एवढा प्रचंड खर्च करूनही रस्ता खचण्याचे तांत्रिक आणि खरे कारण शोधण्यासाठी IIT खडकपूरच्या तज्ज्ञांच्या टीमला चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच ‘लेझर प्रोफिलोमीटर’ तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण ६३ किमीच्या रस्त्याची तपासणी केली जाणार आहे.








