आजकाल सगळेचजण आपापल्या आयुष्यात इतके व्यस्त आहेत की एकमेकांशी बोलण्यासाठी, भेटण्यासाठीही वेळ नाही आहे. पण या व्यस्त आयुष्यात जर आपल्या मृत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही वेळ न मिळणं यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय असू शकतं. होय, हे घडलं आहे हरियाणातील सोनीपत येथे. येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून टाकलं. यामुळे वृद्ध पालकांचे वाढते एकाकीपण आणि बदलते कौटुंबिक संबंध यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
निर्दयीपणाचा कळस
ज्या मुलींना लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी आयुष्यभर मेहनत घेतली, त्याच मुलींना वडिलांच्या अखेरच्या क्षणी भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही. हरियाणातील सोनीपतच्या वेस्ट रामनगर परिसरातील एका वृद्धाश्रमात राहणारे 74 वर्षीय शिवचरण गुप्ता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत. वृद्धाश्रम प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या सुमारे 20 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. याची माहिती वेळोवेळी त्यांच्या मुलींना देण्यात आली होती. मात्र, कोणतीही मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली नाही.
वृद्धाश्रमात राहण्याची वेळ
वृद्धापकाळात मुलींनीच आपल्या वडिलांना दूर लोटलं.वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आणि तिथंच मुलींची वाट बघत वडिलांनी प्राण सोडले. त्यांच्यावर अंत्यसंस्काराला येण्यासाठीही मुलींना वेळ नव्हता. वृद्धाश्रम संचालकांनी फोन केल्यावर त्यांना रुपये पाठवले आणि अंत्यसंस्कार उरकून घ्या असं सांगण्यात आलं. वडिलांच्या अस्थी नेण्यासाठीही मुली आल्या नाहीत. सोनीपतच्या शिवचरण गुप्ता यांच्यावर अंत्यसंस्कार आणि अस्थी विसर्जनाची जबाबदारी वृद्धाश्रमानेच पार पाडली.
मुलींना शेवटचं एकदा पाहण्याची तीव्र इच्छा होती
शिवचरण गुप्ता हे पूर्वी कपड्यांचे व्यापारी होते. पत्नीसोबत ते वृद्धाश्रमात राहायला आले होते. तेव्हा काही काळाने पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर ते एकटेच वृद्धाश्रमात राहत होते. आजारपणात असताना त्यांना आपल्या मुलींना शेवटचं एकदा पाहण्याची तीव्र इच्छा होती. मात्र ती इच्छा अपुरीच राहिली आणि मुलींची वाट पाहत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवचरण गुप्ता यांना मुलगा नव्हता. त्यांनी आपल्या तीनही मुलींचे प्रेमाने संगोपन केले. त्यांना चांगले शिक्षण दिले आणि स्वावलंबी बनवले. त्यापैकी दोन मुली शिक्षिका झाल्या. मात्र, वडिलांच्या निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने संपर्क साधला असता, मुलींनी वेळेअभावी येणे शक्य नसल्याचे सांगितल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
Shivcharan Gupta, 74, a cloth merchant living in an old age home in Sonipat, died yesterday. He had three daughters; sadly and surprisingly, not one of them turned up for his funeral.
He and his late wife had raised and educated their three daughters, ensuring they were all… pic.twitter.com/9fZtGYlsCD
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) August 5, 2026
व्हिडिओ कॉलवर पाहिला अंत्यसंस्कार
वृद्धाश्रम प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी स्वतः येण्याऐवजी अंत्यसंस्काराचा खर्च म्हणून ५१०० रुपये पाठवले आणि अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवण्याची विनंती केली.अंत्यसंस्काराची प्रक्रिया त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पाहिल्याचे सांगितले जात आहे.
कुटुंबातील कोणीही उपस्थित नसल्याने वृद्धाश्रमातील कर्मचारी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत शिवचरण गुप्ता यांची अंत्ययात्रा काढली. सर्व धार्मिक विधी पार पाडत त्यांनी मुलाचे कर्तव्य निभावले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
अस्थीही नेण्यास मुलींचा नकार
अंत्यसंस्कारानंतरही मुलींनी वडिलांच्या अस्थी घेण्यासाठी येणार नसल्याचे सांगितलं. त्यांनी त्या अस्थी गंगेत विसर्जित करण्याची विनंती त्यांनी वृद्धाश्रम प्रशासनाला केल्याची माहिती समोर आली आहे. मुलांपेक्षा मुलींना आपल्या पालकांची काळजी असते, प्रेम असतं असं म्हणतात पण या प्रसंगानंतर खरंच आता मुली आणि मुले वेगळी आहे का? असा प्रश्न पडतो.








