महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय आव्हाने लक्षात घेता मालाड विधानसभेतील विविध पदांच्या नियुक्त्या कार्यक्षेत्रानुसार आणि योग्य जबाबदारीचे वाटप करून करण्यात आल्या आहेत. पक्षाचे विचार, ध्येय धोरणे आणि कार्यक्रम तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवावेत, असा स्पष्ट संदेश पक्षाच्या वरिष्ठांकडून नवनिर्वाचित पदाधिकार्यांना देण्यात आला आहे. तसेच पक्षीय नियोजनाचा हा एक भाग असून, याद्वारे स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवणे आणि पक्षाचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे हा देखील उद्देश आहे.
१४ पदाधिकार्यांवर नवीन जबाबदारी
या संघटनात्मक फेररचनेत एकूण १४ कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने आधी शाखाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे सुनील घोंगे आणि वकील . सुशिंदर मुत्तुस्वामी यांची मालाड विधानसभेच्या विभाग सचिवपदी पदोन्नती करण्यात आली आहे. याशिवाय मुकेश शेलार यांची प्रभाग क्रमांक ३४ च्या शाखाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांमुळे मालाडमधील मनसेच्या संघटन कौशल्याला नवी ऊर्जा आणि गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सर्व नियुक्त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या आहेत.
कामात कुचराई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
नवीन नियुक्त्यांची घोषणा करताना पक्षाकडून अत्यंत कठोर आणि स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय-धोरणे, विचार आणि उपक्रम आपण सर्वांनी वेळोवेळी आपापल्या कार्यक्षेत्रात निष्ठेने व प्रामाणिकपणे राबवावेत. पक्ष कार्यात कोणतीही कुचराई, हलगर्जीपणा अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही,” असा कडक इशारा तथा जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे.
लोकांना त्रास नको, वर्तनाबाबत स्पष्ट सूचना
पदाधिकार्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात त्यांच्या वर्तणुकीबाबतही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. “आपल्या अथवा आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून समाजातील कोणत्याही घटकाला किंवा नागरिकाला कसलाही त्रास होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे,” असं पक्षाने बजावून सांगितलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी लढताना पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नियुक्त्या एका वर्षाच्या कालावधीसाठी असणार
या सर्व नियुक्त्या एका वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आल्या आहेत. या १ वर्षात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा सविस्तर कार्यअहवाल,आढावा पक्षाकडून तपासला जाणार असून या अहवालाचे आणि प्रत्यक्ष कामगिरीचे मूल्यमापन करूनच संबंधित पदाधिकाऱ्याला पुढील मुदतवाढ द्यायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याचं पक्षानं सांगितलं आहे. तसेच या नियुक्त्या झाल्यानंतर पक्षाने सर्व १४ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या आहेत.








