गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी कोकणात जाण्याची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.एसटी महामंडळाने हजारोंच्या घरात जादा बसगाड्या सोडण्याची घोषणा केली आहे.गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने तब्बल ५,२२० जादा बसगाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. ७ ऑगस्ट रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ तब्बल 5220 जादा बसगाड्या सोडणार असल्याने कोकणवासीय मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाता येणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर विभागांतील प्रमुख बसस्थानकांवरून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.
विशेष जादा गाड्या कधीपासून?
यंदा गणेशोत्सवात गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ७ सप्टेंबरपासून जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. या गाड्यांचा कालावधी २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, नफा-तोटा न पाहता प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यास महामंडळ कटिबद्ध आहे. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाला विशेष भावनिक महत्त्व असून, गणपती बाप्पा, कोकणवासीय आणि एसटी यांच्यातील नाते घट्ट असल्याचेही त्यांनी नमूद केलं.
गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार
– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक pic.twitter.com/0jmJAF1LRM
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) August 7, 2026
आरक्षण आणि ग्रुप बुकिंगची सुविधा कशी असणार?
जादा बसगाड्यांचे आरक्षण एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच एसटी बस रिझर्वेशन मोबाईल ॲपद्वारे करता येईल. तसेच प्रवाशांना बसस्थानकांवर जाऊन देखील तिकीट बुक करता येणार आहे.
किमान ४० प्रवाशांचा ग्रुप असल्यास १० ऑगस्टपासून ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेअंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे, तर अमृत योजनेअंतर्गत नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत मिळणार आहे.
प्रवासादरम्यान अतिरिक्त सुविधा
गणेशोत्सव काळात प्रवास सुरळीत व्हावा यासाठी प्रमुख बसस्थानके आणि थांब्यांवर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी चोवीस तास तैनात राहणार आहेत. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर वाहन दुरुस्ती पथकेही सज्ज ठेवली जाणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना तातडीने मदत मिळू शकेल आणि प्रवास विनाअडथळा पार पडेल. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा होणार हे नक्की.








