नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आल्यापासून या महामार्गाबद्दल कायम काही ना काही अडचणीच ऐकायला मिळाल्या आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि कमी वेळात अधिक अंतर गाठता यावे यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग बनवण्यात आला होता. मात्र कधी अपघात तर कधी येथील समस्यांमुळेच हा महामार्ग अधिक चर्चेत असतो. समृद्धी महामार्गावर आवश्यक सुविधाही नसल्यामुळे नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.
बऱ्याच वेळेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
जसं, अनेक रस्त्यावर कठडे लावून ठेवले जातात. तर थोड्या चुकांसाठीही प्रवाशांची अडवणूक केली जाते. त्यामुळे नागरिक आणि वाहतूक पोलिसांमध्ये अनेकदा वाद होतो. असाच काहीसा वादाचा प्रकार रविवारी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर घडला. यामुळे ट्रक चालकाने चक्क त्याचा मोठा ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला. यामुळे अनेक काळ वाहतूक कोंडी झाली होती.
नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावर एका ट्रकचालकाने चक्क ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा लावून चावी घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६० जवळ घडली.
– समृद्धी महामार्गांवर ट्रक आडवा करून चालक चाबी घेऊन पसार
– ट्रक आडवा लावल्याने नागपूर मुंबई मार्गांवरील वाहतूक बंद
– समृद्धीच्या चॅनल नंबर 60 वरील घटना
– आरटीओ सोबत वाद झाल्याची प्राथमिक माहिती
– ट्रक आडवा केल्याने समृद्धीवरील एका मार्गाची वाहतूक विस्कळीत pic.twitter.com/QcghPiBptd— ✧ 𝕾𝖍𝖚𝖇𝖍𝖆𝖒 ✧ (@shubham_pb) August 9, 2026
संतापलेल्या चालकाने थेट त्याचा ट्रक महामार्गावरच आडवा लावला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचालकाचा आरटीओच्या अधिकाऱ्यांसोबत काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या चालकाने थेट त्याचा ट्रक महामार्गावरच आडवा लावला आणि वाहनाची चावी घेऊन तेथून निघून गेला. ट्रक आडवा असल्याने महामार्गावरील एका मार्गाची वाहतूक पूर्णपणे जाम झाली. तब्बल दीड तासापासून या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती आहे. अचानक वाहतूक थांबल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. घटनास्थळी वाहनांच्या रांगा वाढतच होत्या. मोठ्या कष्टाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
आरटीओसोबतचा चालकाचा वाद पण इतरांना मनस्ताप
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक चौधरी आणि त्यांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आलं. चालक नेमका कुठे गेला आणि आरटीओसोबत त्याचा वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.या वादामुळे इतर प्रवाशांना मात्र हाकनाक मनस्ताप सहन करावा लागला.








