संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी 18 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी उपोषणाची घोषणा केली आहे. या आंदोलनात बेस्टच्या विद्यमान कर्मचाऱ्यांबरोबरच, खासगी कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वेट लीज बसमधील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या जातील.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून परिणाम होणार आहे. कारण मुंबईतील बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटनेने आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आज म्हणजेच मंगळवार १८ ऑगस्टपासून परिवहन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. सकाळी ११.३० वाजल्यापासून या संपाला सुरुवात झाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील बेस्ट बससेवेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दररोज बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या हजारो मुंबईकरांना याचा फटका बसणार आहे.
मागण्या काय आहेत?
संघटनेने 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीतील वेतन करारांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी समान वेतनश्रेणी लागू करण्याची मागणीही केली आहे.
वेट लीज कर्मचाऱ्यांसाठी समान वेतनाची मागणी बेस्ट कामगार संघटनेने वेट लीज व्यवस्थेअंतर्गत खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला आहे. युनियनची मागणी आहे की, या कर्मचाऱ्यांना ‘समान कामासाठी समान वेतन’ या तत्त्वानुसार वेतन आणि लाभ दिले जावेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर अंतिम देयके वेळेवर देण्याचीही त्यांची मागणी आहे. युनियनने बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दाही उपस्थित केला असून, त्याच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक निधीला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
मुंबईकरांसमोर प्रवासाचे संकट
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील अनेक मार्गांवरील बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांना पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागू शकतो. कारण लोकलनंतर बेस्ट ही मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाची सेवा आहे. त्यामुळे संपाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे. बससेवा कमी झाल्यास लोकल, मेट्रो, मोनोरेल, टॅक्सी आणि रिक्षांवर अतिरिक्त प्रवासी भार येऊ शकतो.








