पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही मराठवाड्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळं भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून, चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.एवढंच नाही तर लातूर शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये सध्या केवळ साडेतेरा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीनं कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा, अशी आग्रही मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा
या पार्श्वभूमीवर धीरज देशमुख यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. धीरज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे या व्हिडीओद्वारे महाराष्ट्रातील अत्यल्प पाऊस झालेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्याची विनंती केली आहे.ते म्हणाले की, “अनेक भागांमध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची उदाहरणं समोर आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा बिकट काळात आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे. ”
View this post on Instagram
संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं महत्त्वाचं
पुढे ते म्हणाले, “पावसाळ्याच्या उर्वरित दिवसांत ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल. त्या भागांत हा प्रयोग राबवून शेतकऱ्यांचं नुकसान टाळता येऊ शकतं. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबाबत निश्चित नसलं तरी, संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतंय, हा विश्वास देणं अत्यावश्यक आहे.” असं धीरज देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
सध्या शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहे. शेतकरी संकटात असल्याने उपलब्ध असलेला प्रत्येक वैज्ञानिक पर्याय वापरण्याची हीच वेळ आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार ठामपणे उभे आहे, हे कृतीतून दाखवण्याची गरज आहे, असेही धीरज देशमुख यांनी म्हटलं.
महाराष्ट्रातील तमाम बळीराजाच्या वतीनं सरकारला साकडे
पावसाची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तमाम बळीराजाच्या वतीनं आपण सरकारला साकडे घालत असल्याचं सांगत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं कृत्रिम पावसाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये हा प्रयोग युद्धपातळीवर राबवावा, असं आवाहन देखील धीरज देशमुख यांनी सरकारला केलंय.








