संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात;
ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू
ठाणे,दि.१५ एप्रिल
देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेले ‘संघटन सृजन अभियान’ ठाणे शहरात सुरू झाले आहे.
‘संघटन सृजन अभियान’ या अभियानाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक माजी आमदार नदीम जावेद, यांच्या समवेत प्रदेश निरीक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस, संघटन सृजन कोकण प्रभारी गुरुबिंदरसिंग बच्चर ही मंडळी ठाणे दौऱ्यावर आले आहेत. या पथकाने बुधवारी ठाणे कांग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आदीसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय निरीक्षक नदीम जावेद यांनी, कशा पद्धतीने संघटन सृजन अभियान राबविण्यात येईल याबाबत विस्तृत माहिती दिली. जावेद यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने वर्ष 2025- 2026 संघटनेसाठी समर्पित केले असून अखिल भारतील स्तरावरील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करत आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय पथक ठाण्यात आले असून पुढील चार पाच दिवस प्रत्येक मतदारसंघात व ब्लॉकमध्ये जाऊन काँग्रेसच्या सर्व स्थरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत. या माध्यमातून आगामी काळात संघर्ष करणारे नेतृत्व निवडले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
तर आमदार अतुल वंजारी यावेळी म्हणाले की, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सर्व राज्यभर संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहेत. प्रदेश व शहर पदाधिकारी, विविध सेल, ब्लॉक व ब्लॉकस्तरीय सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी वैयक्तिक स्वरूपात संवाद साधून मते जाणून घेण्यात येतील. नवीन जिल्हा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी कशा पद्धतीचे असले पाहिजे, याची निवड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.या गुरुवारपासून पुढील चार दिवस वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्याशी केंद्रीय निरीक्षक वैयक्तिक संवाद साधून 20 ते 21 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे अहवाल पाठविला जाईल.त्यानंतर 10 मे पर्यंत जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या जातील. असेही आ. वंजारी यांनी स्पष्ट केले.










