तमिळनाडूच्या राजकारणात अखेर मोठा पेच संपुष्टात आला असून, ‘तमिळगा वेत्री कळघम’ म्हणजेच TVK पक्षाचे प्रमुख विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.
गुरुवारी ७ मे रोजी विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची पुन्हा एकदा भेट घेत सरकार स्थापनेचा औपचारिक दावा सादर केला. या भेटीत विजय यांनी आपल्या सरकारला मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत सविस्तर माहिती राज्यपालांना दिल्याचे समोर आले आहे.
शपथविधीनंतर विधानसभेत आपण सहज बहुमत सिद्ध करू, असा ठाम विश्वास विजय यांनी राज्यपालांसमोर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, सरकार स्थिर राहील आणि बहुमताबाबत कोणतीही अडचण येणार नाही, असेही विजय यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विजय यांनी आपल्या समर्थनार्थ उभ्या असलेल्या पक्षांची आणि आमदारांची आकडेवारी राज्यपालांसमोर मांडली. त्यानंतर राज्यपाल आर्लेकर यांनी समाधान व्यक्त करत विजय यांना सरकार स्थापनेसाठी औपचारिकपणे निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे.
तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली TVK पक्षाने मोठी राजकीय ताकद निर्माण केल्यानंतर आता सत्तेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.
दरम्यान, विजय यांच्या शपथविधीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, तमिळनाडूत नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होणार का, याची उत्सुकता वाढली आहे









