लातूरमधील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना प्रशासनाकडून मिळालेला बैल व गावकरी
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील एका गरीब शेतकऱ्याची व्यथा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतमजूर बटईने शेती करून आपल्या सहा मुलांचा उदरनिर्वाह करतात.
काही दिवसांपूर्वी वळवाच्या पावसादरम्यान वीज पडून त्यांच्या जोडीतील एका बैलाचा मृत्यू झाला. ऐन पेरणीच्या तोंडावर बैल गेल्याने गायकवाड कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने आणणेही त्यांना शक्य नव्हते.
अखेर काशिनाथ गायकवाड यांच्या पत्नीने स्वतःच्या खांद्यावर जू घेत पतीसोबत नांगरणी करण्याचा निर्णय घेतला. हा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि तातडीने मदतीची घोषणा करण्यात आली.
मात्र, प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला बैल शेतातील कामासाठी योग्य नसल्याचे समोर आले आहे. शेतकरी कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, हा बैल नांगरणीसाठी सहकार्य करत नसून शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे सरकारी मदतीनंतरही गायकवाड कुटुंबाचे संकट कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एकीकडे पेरणीचा हंगाम सुरू असताना दुसरीकडे शेतीसाठी आवश्यक असलेले जनावरच कामाला तयार नसल्याने या शेतकरी कुटुंबाची चिंता वाढली आहे. आता प्रशासन या प्रकरणात योग्य आणि सक्षम मदत देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे








