BEST संयुक्त कामगार कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेतन कराराचा फेरविचार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
बेमुदत आंदोलनाचाही इशारा
मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा तसेच बेमुदत आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. यामागील कारण म्हणजे कृती समितीने 21 जून रोजी झालेल्या वेतन करारावर आक्षेप घेतला आहे.कर्मचाऱ्यांशी कोणतीही व्यापक चर्चा न करता हा करार करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर वेतन कराराचा फेरविचार करून सर्व संबंधित संघटनांशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 15 ऑगस्टपर्यंत प्रमुख मागण्यांबाबत दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. वेतन कराराच्या फेरविचाराची प्रमुख मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी केली आहे.समितीच्या देखील आणखी काही प्रमुख मागण्या आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
सुधारित वेतनश्रेणी लागू करावी.
महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सेवा-शर्ती लागू कराव्यात.
आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी.
प्रलंबित वेतन कराराची तातडीने अंमलबजावणी करावी.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान दाम’ या तत्त्वानुसार वेतन द्यावे.
15 ऑगस्टनंतर बेमुदत संपाचा इशारा
समितीने स्पष्ट केले आहे की, 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर जातील. त्यामुळे मुंबईतील बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे कर्मचारी तसेच मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.








