महाराष्ट्रातील कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री व्यवसायाला सध्या वाढता उत्पादन खर्च, कंपन्यांकडून मिळणारा अपुरा मोबदला आणि करारांमधील असमान अटींमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. शासनाने कुक्कुटपालकांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयासमोर राज्यव्यापी शांततामय आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनात संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने पोल्ट्री व्यावसायिक, शेतकरी, युवक, महिला व ग्रामीण भागातील कुटुंबे सहभागी होणार आहेत.
प्रमुख मागण्या
हे राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर, सचिव विलास साळवी, आणि कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन पशुसंवर्धन समन्वय समितीचे सदस्य शरद गोडांबे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हे आंदोलन शासनाविरोधातील संघर्ष नसून, शासनानेच वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची प्रामाणिक, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते म्हणजे
२२ जुलै २०२४ चा शासन निर्णय : करार पद्धतीने मांसल (बॉयलर) कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली. यात कंपन्या आणि शेतकरी यांच्यात नोंदणीकृत (रजिस्टर्ड) करारनामा करणे अनिवार्य करण्यात आले होते.
३१ जुलै २०२५ चा शासन निर्णय : कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी व्यवसायासमकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यानुसार पात्र पोल्ट्री फार्म्सना कृषी दराने वीज, सौरऊर्जा सुविधा, सवलतीच्या दरात ग्रामपंचायत कर आकारणी आणि कर्जाच्या व्याजात सवलती मिळणे अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांचा आक्षेप : शासन निर्णय निर्गमित होऊनही प्रशासकीय दुर्लक्षामुळे या निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ सामान्य कुक्कुटपालकांच्या फार्मपर्यंत पोहोचलेला नाही. हे निर्णय केवळ कागदावरच राहिल्याने शेतकरी आजही वाढत्या विजेचे बिल, स्थानिक कर आणि कंपन्यांच्या मनमानी कारभाराला बळी पडत आहेत.
जिल्हा प्रशासनाला निवेदने व आंदोलनाची तयारी
आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून सध्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले जात आहे.शासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यास १ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाबाहेर शांततामय आंदोलन व मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष प्रलंबित प्रश्नांकडे वेधून कुक्कुटपालक शेतकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
या आंदोलनात जिल्ह्यातील व राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रोहिदास गायकर, दीपक झाल्टे, वसंत भोसले, विक्रम पासलकर, उमेश मोरे, गोरख वाजे, मधुकर पवार, प्रवीण आवारी, नेमीनाथ गुळवे, तुकाराम गाढवे, सोमनाथ गायकर, ज्ञानेश्वर राव आणि साहेबराव खांडवी यांनी संयुक्तपणे केले आहे.








