मढ परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मढ रिट्रीट हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा भीषण अपघात झाला. हा अपघात रस्त्यावर अचानक आलेल्या म्हशीला धडकून झाला आहे . अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पण दुर्दैवाने उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या मृत तरूणाचं नाव प्रणिकेत कोळी असल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडताच वॉर्ड क्रमांक ४९ चे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी पोलिसांना तातडीने माहिती देऊन मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पण, तरीही या अपघाताने प्रशासकीय अनास्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हा केवळ एक अपघात आहे की प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम? असे अनेक सवाल आता नागरिक विचारत आहेत.
अंधाराचे साम्राज्य आणि वारंवार होणारे दुर्लक्ष
मढ रिट्रीटसमोरील मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी या मार्गावर प्रचंड अंधार असतो, ज्यामुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने किंवा जनावरे स्पष्ट दिसणे कठीण होते. विशेष म्हणजे, या समस्येबाबत ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’ने यापूर्वीही अनेकदा बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु, पालिका आणि संबंधित प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. रस्त्यावर पुरेसा प्रकाश असता, तर कदाचित त्या तरुणाला समोर आलेली म्हैस वेळेत दिसली असती आणि त्याचा जीव वाचू शकला असता.
अपुरी आरोग्य व्यवस्था अन् उपचारांमधील विलंब जीवघेणा
अपघातानंतरची दुसरी मोठी शोकांतिका म्हणजे मढ परिसरात अद्यापही सुसज्ज मुख्य रुग्णालयाची सोय नाही. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीच्या उपचारासाठी शहरात इतरत्र हलवावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत सुरुवातीचे काही मिनिटे उपचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात, मात्र मढमध्ये स्थानिक पातळीवर तातडीने वैद्यकीय मदत न मिळाल्याने हा विलंब रुग्णाच्या जीवावर बेततो.
नागरिकांचे सवाल आणि मुख्य मागण्या
एकीकडे पथ दिवे बंद असल्याने रस्त्यांवर पसरलेला अंधार, दुसरीकडे भटक्या व मोकाट जनावरांचा वाढता वावर आणि तिसरीकडे अपुरी आरोग्य यंत्रणा, या तिहेरी समस्यांमुळे मढमधील नागरिकांचे जिणे धोक्यात आले आहे. प्रशासनाने आणखी किती बळी जाण्याची वाट पाहायची, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
या पार्श्वभूमीवर मढमधील नागरिकांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये
१) पथदिवे तातडीने सुरू करावेत : बंद असलेले सर्व पथदिवे प्राधान्याने दुरुस्त करून मुख्य रस्त्यांवर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी.
२) मोकाट जनावरांचा बंदोबस्त : मुख्य रस्त्यांवर अचानक येणाऱ्या भटक्या व मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. जेणेकरून असे अपघात होणार नाहीत.
३) सुसज्ज रुग्णालयाची उभारणी : मढ परिसरासाठी तातडीने सुसज्ज रुग्णालय आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
जागृत महाराष्ट्र न्यूजने यापूर्वीही हे गंभीर प्रश्न मांडले होते. पण आज घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासनाला जाब विचारावासा वाटतोय की, आता तरी संबंधित अधिकारी झोपेतून जागे होऊन यावर ठोस कारवाई करणार की आणखी एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहणार?








