महाराष्ट्रात पावसाचा जोर हळू हळू कमी होऊ लागला आहे. अचानक पावसाने दडी मारली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर काही भागांत पावसाची मध्यम स्थिती जाणवण्याची अधिक शक्यता आहे. तर काही भागांत विजांसह पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. पाऊस हुलकावणी देत आहे. पावसाअभावी पीके सूक लागल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत. राज्यात पावसाची सध्या स्थिती काय आहे हे जाणून घेऊयात.
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. तर नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाची पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव आणि बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. लातूर, हिंगोली आणि नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात गेल्या वीस दिवसांपासून पावसाची कमतरता जाणवत आहे. परिणामी, उडीद, मूग, मका आणि सोयाबीन यांसारख्या सर्वच पिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विदर्भ
हवामान विभागाने विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा कोणताही अंदाज वर्तवलेला नाही.
पावसाच्या या अशा चित्रामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. एवढंच नाही तर काही शहरात फक्त ढगाळ वातावरण होत असून पाऊस पडत नसल्यामुळे वातावरणातील दमटपणा आणि उष्णता हळू हळू जाणवू लागली आहे. विशेषत: मुंबईसारख्या शहरात.








