आदगाव कुणबीवाडी मुंबई मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील बोरिवली येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं.
१० वी आणि १२ वीमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने विशेष पदक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या मानसी पाटीलचा विशेष गौरव
या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आदगावची लाडकी लेक कुमारी मानसी निलेश पाटील हिचा विशेष सन्मान! मानसीच्या या उत्तुंग यशाबद्दल मंडळाच्या वतीने तिला सन्मानपत्र बहाल करण्यात आले. मानसीच्या अनुपस्थितीत तिचे वडील श्री. निलेश नारायण पाटील यांनी हे सन्मानपत्र स्वीकारलं. पोलीस दलात प्रवेश मिळवून संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केलं.
मान्यवरांची उपस्थिती
हा सोहळा मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास मंडळाचे कार्याध्यक्ष जनार्दन शिंदे, सेक्रेटरी अमित साळवी, खजिनदार अविनाश दुर्गावले यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळ आणि आदगाव कुणबीवाडीतील ग्रामस्थ व मुंबईकर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता झाली.








